जालना जिल्ह्यात ७ लाख व्यक्तींचे सर्वेक्षण  

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्ये फिव्हर क्लिनिक सुरु-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर जालना: जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, ग्रामसेवक यांच्यामार्फत ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत काय याची तपासणी करण्यासाठी जिल्हयातील जवळपास 3 लाख कुटूंबातील 7 लक्ष व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले असुन ताप, सर्दी, खोकला अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधताना केले. आज दि.12 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तसेच गौणखनिज या विषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार श्री पडघन आदींची उपस्थिती होती.यावेळी माहिती देताना डॉ. खतगावकर म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये 218 उपकेंद्र, 41 प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदीक, तसेच युनानी दवाखान्यामध्ये फिव्हर क्लिनिकची सुरुवात करण्यात आली.  जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांना थर्मलगन, पल्स ऑक्सीमीटर, नेब्युलाईजरचा पुरवठा करण्यात आला.  जिल्ह्यातील 985 गावामध्ये अँटीकोरोना फोर्सची स्थापना करण्यात येऊन याफोर्सच्या माध्यमातुन ग्रामीण पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.  परराज्य अथवा परजिल्ह्यातुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यात येत असुन या व्यक्तींची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन त्यांना होमक्वारंटाईन, संस्थात्मक अलगीकरणाची कार्यवाही करण्यात असल्याचे सांगत आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये 81 हजार व्यक्ती दाखल झाल्या आहेत.  तसेच परजिल्हा व परराज्यातील जे व्यक्ती जालना जिल्ह्यात अडकुन पडले होते अशा सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याची माहितीही श्री. खतगावकर यांनी यावेळी दिली.             राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या पुढकाराने जालना जिल्ह्यातील जनतेला वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी दवाखान्यामध्ये रिक्त असणारी पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात आली असुन वैद्यकीय अधीक्षक, नर्सेस आदी 187 रिक्त पदे भरण्यात आली आहेत.              संशयित रुग्णांच्या लाळेचे अहवाल आजघडीला तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत आहेत.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथे आरटीपीसीआर लॅबला मंजुरी मिळाली असुन ही लॅब येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कार्या‍न्वित करण्याच्यादृष्टीने काम करण्यात येत आहे.   नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.  गर्दीच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्कचा, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याबरोबरच आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावे. नागरिकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन 223132,1075,104 अथवा 6366783101 या क्रमांकावर माहितीसाठी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करत नागरिकांनी आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.             जिल्ह्यात असलेल्या 50 वर्षावरील व्यक्ती ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार, ऱ्हदयरोग, टी.बी. एचआयव्ही अशा व्यक्तींचा सर्वे करण्यात येणार असुन त्यांची तपासणी करण्यात येणार असुन कोव्हीड विषाणुची बाधा झालेल्या व्यक्तींना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे.             जिल्ह्यात नॉनकोव्हीड रुग्णांनाही आरोग्याच्या सेवा देण्यासाठी काम करण्यात येत असुन जालना जिल्ह्यामध्ये               1 हजार 100 क्षयरुग्ण, 2 हजार 500 एचआयव्ही, तसेच 134 कुष्ठरोगाचे रुग्ण असुन अशा सर्व रुग्णांना घरपोहोच औषधी पुरवण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.           

Read more