गंगापूर तालुक्यातील अवैध खदानीविरोधात जनहित याचिका

औरंगाबाद, दिनांक 9 :

गंगापूर तालुक्यातील अवैध खदानीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत  न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी प्रशासनाला नोटीस बजावली. याचिकेवर तीन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

पाचपीरवाडी येथील अंबरसिंग छगन जंजाळे आणि वरझडी येथील झनकसिंग शामसिंग पल्हाटे यांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्या मार्फत अवैध खदानीविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली आहे. याचिकेनुसार,पाचपीरवाडी येथील गट क्रं. ६४ व वरझडी येथील गट क्रं. १७ या शासनाच्या मालकीच्या जागेवर खदानी आहेत. वर्ष २०१६ पासून या दोन्ही गावातील खदानीमधून अवैधरित्या खदानी फोडून दगडाचा बेसुमार उपसा सुरु आहे. याविषयीची तक्रार तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र अद्यापही खदानीतील उत्खनन थांबलेले नाही. त्यामुळे सदर उत्खनन तात्काळ थांबविण्यात यावे. उत्खननास जबाबदार व्यक्तींविरोधात खाण व खनिज(विकास व विनियमन) अधिनियम १९५७ च्या कायद्यातील तरतूदीनुसार फौजदारी कार्यवाही करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. खाण व खनिज (विकास व विनीयमन) अधिनियम, १९५७ मधील तरतुदीनुसार, विनापरवाना गौणखनिज उत्खननास मनाई करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कायद्याच्या कलम २१ अन्वये, दोन वर्षाची कैद व २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर खाण व खनिज प्रतिबंध व बेकायदेशीर खाण व खनिज वाहतूक नियम, २००१ अन्वये, अवैध उत्खनन करणाºयास एक वर्षाची कैद व २५ हजारांच्या दंडाची तरतूद करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.