महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,दि.24 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए.पी.शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राला एकूण तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश , अरूणाचल प्रदेश या राज्यांचे कृषिमंत्री यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धिरज कुमार  यावेळी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थ्यांची  तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गाव निहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील  ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले.तसेच राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ६३२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही सन्मान

या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे  जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे  यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८  तक्रारींपैकी २०६२  तक्रारींचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला .

या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा मान पटकाविणाऱ्या अहमदनगर जिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८ हजार ८०२ लाभार्थींपैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना घरबसल्या लाभ मिळत आहे पीएम-किसान योजनेचा लाभ

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या यशस्वी द्विवर्षपूर्ती निमित्त केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते. गाव-गरीब-शेतकरी यांचा विचार करणारे तसेच समग्र व समतोल विकासाची कल्पना प्रत्यक्षात राबविणारे सरकार हेच उत्तम सरकार असते असे तोमर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील कोट्यावधी शेतकर्‍यांना घरबसल्या पीएम-किसान योजनेचा लाभ मिळत आहे, ही योजना भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. सुमारे पावणे 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारांनी यासाठी अभियान राबवावे असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले.

नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री  कैलाश चौधरी तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे कृषीमंत्री उपस्थित होते. तोमर यांनी विविध विभागांमध्ये राज्ये / जिल्ह्यांना पुरस्कारांचे वितरण केले.

केंद्रीय मंत्री तोमर यांनी यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले तसेच सामान्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करणाऱ्या व चांगल्या, अर्थपूर्ण योजनेबद्दल पंतप्रधान  मोदी यांचे आभार मानले. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत 10.75 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांची ओळख पटवून त्यांना 1.15 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण हे मोदी सरकारचा संकल्प व कार्यक्षमता दर्शवते असे ते म्हणाले .

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये राज्यांनी चांगली भूमिका बजावली आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. कोरोनासारख्या संकटग्रस्त परिस्थितीतही शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आणि सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे असे तोमर यांनी यावेळी सांगितले.

पुरस्कार सोहळ्यात कर्नाटक राज्याला आधार प्रमाणन लाभार्थ्यांना सर्वाधिक टक्केवारी प्राप्त करण्यासंदर्भातील श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला.  पडताळणी आणि तक्रार निवारण क्षेत्रात उत्तम कामगिरीच्या श्रेणीत महाराष्ट्राला गौरविण्यात आले. विविध श्रेणीत राज्यामध्ये   चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना आधार प्रमाणीकरण श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच  पीएम -किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देखील गौरविण्यात  आले.

तक्रार निवारण श्रेणीत  महाराष्ट्रातील पुणे, गुजरातमधील दाहोद आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हा यांना, तर ईशान्य / डोंगराळ प्रदेश श्रेणीसाठी  उत्तराखंडचा नैनीताल जिल्हा तसेच हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्हा यांना सन्मानित करण्यात आले. भौतिक पडताळणी श्रेणीत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा आणि बिहारमधील औरंगाबाद जिल्हा यांना पुरस्कृत करण्यात आले.