लॉकडाऊन कालावधी 28 फेब्रुवारी पर्यंत ,प्रवाशांची कोव्हीड-19 ची तपासणी करूनच राज्यात प्रवेश
औरंगाबाद, दिनांक 17 : राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन, सदर कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.
तसेच आरोग्य मंत्रालय भारत सरकार, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या इतर लोकांनी संपर्कात येऊ नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, इ. बाबींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये औरंगाबाद जिल्हयात (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) MISSION BEGIN AGAIN अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 28 फेब्रुवारी 2021 चे 24.00 वाजेपर्यत वाढवलेला आहे.
तसेच शासन आदेशानुसार केरळ या राज्यातून हवाई, रेल्वे अथवा रस्ते वाहतूक मार्गे येणा-या प्रवाशांची कोव्हीड-19 ची तपासणी करूनच राज्यात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुनील चव्हाण, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात हवाई, रेल्वे अथवा रस्ते वाहतूक मार्गे येणा-या प्रवाशासाठी परिशिष्ट- अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेशात नमुद आहे.
परिशिष्ट -अ
कोव्हीड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हयासाठी मार्गदर्शक सूचना
देशाअंतर्गत हवाई प्रवास |
1. केरळ या राज्यातून औरंगाबाद विमानतळावर येणा-या हवाई प्रवाशांकडे विमानतळावर येण्यापूर्वी RT-PCR चाचणीचे निगेटीव्ह (Negative) अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. विमानतळावरील पथकास सदरील अहवाल दाखविणे आवश्यक आहे. विमानतळ प्राधिकारी, चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद यांनी उक्त नमूद हवाई प्रवाश्यांची तपासणी करुन याची खातरजमा करावी.
2. औरंगाबाद विमानतळावर येण्यापूर्वी 72 तास आधी RT-PCR चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे.
3. केरळ राज्यातून येणा-या व औरंगाबाद विमानतळावर उतरणाऱ्या ज्या प्रवाश्यांकडे वरील नमूद अट क्रमांक 1 व 2 नुसार RT-PCR चाचणीचे अहवाल नसतील, अशा प्रवाश्यांना विमानतळावर मनपा, औरंगाबाद यांच्या आरोग्य विभागांच्या टिमकडून मोफत RT-PCR चाचणी करणे बंधनकारक असेल. तथापी विमानतळ प्राधिकरण, चिकलठाणा औरंगाबाद यांनी वेगळया एजन्सी मार्फत चाचणी केंद्र कार्यान्वीत केल्यास सदरील RT-PCR चाचणीचा खर्च प्रवाश्यांकडून विहित दराने वसूल करावा.
वरील प्रमाणे चाचणी झाल्यानंतरच संबंधीत प्रवाश्यांना घरी सोडण्यास विमानतळ प्राधिकारी यांना परवानगी राहील. अशा सर्व प्रवाश्यांची संपर्क विषयक माहिती व पत्ते इत्यादी स्वरुपाची माहिती विमानतळ प्राधिकारी यांनी जतन करून ठेवावी जेणे करून अहवाल पॉझीटिव्ह (Positive) आल्यास संबंधाशी संपर्क साधने सोईचे होईल. सदरील संपूर्ण माहिती दररोज आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांना देणे बंधनकारक असेल.
4. पॉझीटिव्ह (Positive) येणा-या प्रवाश्यांशी संपर्क साधून सध्याच्या कोव्हीड-19 च्या प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येतील.
5. विमानतळ प्राधिकारी, चिकलठाणा औरंगाबाद यांनी सदरील कामी CISF यांची मदत घ्यावी.
6. उक्त बाबींसाठी आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद हे नोडल अधिकारी असतील व त्यांनी वरील प्रमाणे सूचनांनाचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही यांची खात्री करतील.
रेल्वे प्रवासी वाहतूक |
1. केरळ या राज्यातून येणाऱ्या/थांबा असणाऱ्या रेल्वेतून औरंगाबाद जिल्हयातील रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडे RT-PCR चाचणीचे निगेटीव्ह (Negative) अहवाल सोबत असणे बंधनकारक आहे.
2. औरंगाबाद जिल्हयात येण्यापूर्वी 96 तास आधी RT-PCR चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे.
3. केरळ या राज्यातून येणा-या व औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या ज्या प्रवाश्यांकडे RT-PCR चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अश्या प्रवाश्यांची कोव्हीड-19 ची, प्रशासक तथा आयुक्त, मनपा औरंगाबाद यांच्या आरोग्य विभागांच्या टिमकडुन मोफत RT-PCR चाचणी करण्यात यावी. तथापी रेल्वे विभागाने वेगळया एजन्सी मार्फत चाचणी केंद्र कार्यान्वीत केल्यास सदरील RT-PCR चाचणीचा खर्च प्रवाश्यांकडून विहित शुल्क वसुल करावा.
4. औरंगाबाद शहरा व्यतिरिक्त इतर रेल्वे स्टेशन उदा. करमाड, लासुर स्टेशन, रोटेगांव या ठिकाणी जिल्हा शल्यचिकीत्सक, औरंगाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांनी आरोग्य पथक स्थापन करुन रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या ज्या प्रवाश्यांकडे RT-PCR चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अश्या प्रवाश्यांची कोव्हीड-19 ची मोफत RT-PCR चाचणी करण्यात यावी. तथापी रेल्वे विभागाने वेगळया एजन्सी मार्फत चाचणी केंद्र कार्यान्वीत केल्यास सदरील RT-PCR चाचणीचा खर्च प्रवाश्यांकडून विहित शुल्क वसुल करावा.
5. ज्या प्रवाश्यांना लक्षणे आढळून येणार नाहीत अश्या प्रवाश्यांनाच घरी सोडण्याची मुभा राहील.
6. ज्या प्रवाश्यांना लक्षणे आढळून येतील अश्या प्रवाश्यांना विलग करून त्यांची RT-PCR करण्यात यावी. अहवाल निगेटीव्ह आल्यास प्रवाश्यांना घरी सोडण्यात यावे.
7. ज्या प्रवाश्यांची चाचणी करण्यात आलेली नसेल/ कोव्हीड-19 Positive प्रवाश्यांना/ रूग्णांना कोव्हीड
केअर सेंटर (CCC) मध्ये पुढील उपचारास्तव दाखल करण्यात यावेत. यावर होणारा खर्च संबंधित प्रवाश्यांनी करावयाचा आहे. याबाबतची संपूर्ण माहिती रेल्वे विभागाने दररोज आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद/जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांना देणे बंधनकारक असेल. रेल्वे स्टेशन करमाड, लासुर स्टेशन, रोटेगांव या ठिकाणी कार्यान्वीत करण्यात येणा-या आरोग्य विभागाच्या टिमला तपासणीच्या कामी पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवावा.
रस्ते प्रवासी वाहतूक |
1. केरळ या राज्यातून रस्ते मार्गे औरंगाबाद जिल्हयात येणाऱ्या ज्या प्रवाश्यांकडे RT-PCR चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अश्या प्रवाश्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांनी जिल्हयाच्या सिमेवर आरोग्य टिम नियुक्त करुन कोव्हीड-19 ची मोफत RT-PCR चाचणी करण्यात यावी. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद यांनी जिल्हयाच्या सिमेवर आरोग्य पथकास सहाय्य करण्यासाठी पथक स्थापन करावे. या बाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांनी योग्य तो समन्वय ठेवावा.
2. पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी औरंगाबाद जिल्हयाच्या सिमेवर कार्यान्वीत करण्यात येणा-या जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या टिमला तपासणीच्या कामी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवावा.
3. ज्या प्रवाश्यांना लक्षणे नसतील अश्याच प्रवाश्यांना औरंगाबाद जिल्हयात प्रवेश करण्यास मुभा देण्यात यावी. ज्या प्रवाश्यांना लक्षणे असतील अश्या प्रवाश्यांना त्यांच्या आलेल्या ठिकाणाकडे परत जाण्यास मुभा असेल.
4. ज्या प्रवाश्यांना लक्षणे आढळून येतील अश्या प्रवाश्यांना विलग करून त्यांची Antigen Test करण्यात यावी. अहवाल निगेटीव्ह (Negative) आल्यास अश्या प्रवाश्यांना पुढे प्रवास करण्यास मुभा देण्यात येईल.
5. ज्या प्रवाश्यांची चाचणी करण्यात आलेली नसेल/ कोव्हीड-19 Positive प्रवाश्यांना/ रूग्णांना कोव्हीड केअर सेंटर (CCC) मध्ये पुढील उपचारास्तव दाखल करण्यात यावेत. यावर होणारा खर्च संबंधित प्रवाश्यांनी करावयाचा आहे.