लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची टीका

मुंबई, 9 फेब्रुवारी 2021:

यवतमाळ येथे पोलिओच्या डोस ऐवजी सॅनिटायजर पाजणाऱ्या दोषींविरुद्ध अजुनही एफआयआर ही दाखल न करणारे महाविकास आघाडी सरकार लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही किती असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा  आला आहे,अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती चित्रा वाघ यांनी मंगळवारी केली.

Image

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माध्यम विभाग सहसंयोजक देवयानी खानखोजे उपस्थित होत्या.

श्रीमती वाघ म्हणाल्या की, दहा दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात  बालकांना जीवनदान पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्याची घटना घडली. त्या मुलांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचे जीव वाचले. मात्र, राज्य सरकारने या घटनेतल्या दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा प्रकारच्या घटनामध्ये सिव्हील सर्जनच्या अखत्यारीत समिती स्थापन करून समितीचा अहवाल पोलिसांना सादर केला जातो आणि मग त्यानुसार पोलिस हे दोषींवर गुन्हा दाखल करतात. मात्र, दहा दिवस उलटूनही राज्य सरकारने अशी समिती स्थापन केली नाही. परिणामी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केलेली नाही.असे बेपर्वा सरकार महाराष्ट्राने या पूर्वी पाहिलेले नाही.

भंडाऱ्यातील रुग्णालयाला आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना पूर्ण झाला. सोमवारी त्या घटनेतील आणखीन एका बालकाचा मृत्यू झाल्याने मृत बालकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतही राज्य सरकारने असाच निष्काळजीपणा दाखवला आहे. या प्रकरणीही अजुनही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही, असे श्रीमती वाघ यांनी निदर्शनास आणून दिले.

श्रीमती वाघ म्हणाल्या की, आत्तापर्यंत राज्यात महिला अत्याचाऱ्याच्या ज्या ज्या घटना घडल्या, त्यातील एकाही घटनेत आरोपींना अटक झालेली नाही. राज्य सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनाच राजाश्रय देताना दिसत आहे. आता तर लहान बालकांची सुरक्षे बाबतीतही या सरकारची बेपर्वा वृत्ती दिसली आहे. मुख्यमंत्री म्हणतात तसे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ त्यानुसार जनतेलाच आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. कारण सरकार म्हणून हे महाविकास आघाडी सरकार केवळ गुन्हेगारांचेच संरक्षण करणार आहे हेच या सगळ्या घटनांमधुन स्पष्ट होताना दिसत आहे.