तुर चोरणार्‍या टोळीतील तीन जणांना अटक ,बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद/प्रतिनिधी
गोडावून फोडून दोन लाखांची 40 क्‍विंटल तुर चोरणार्‍या टोळीतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी दि.8 रात्री अटक केली. त्यांच्याकडून 38 क्‍विंटल तूर जप्‍त करण्यात आली आहे. आरोपींना बुधवारपर्यंत दि.10 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी मंगळवारी दि.9 दिले.
इलियास सुलेमान खान (32, रा. जिन्सी), जब्बार बुढण पठाण (28, रा. श्रीपत धामनगाव ता. परतुर जि. जालना) आणि रवि लक्ष्मण वाहुळे (27, रा. पिंपळी धामणगाव ता. परतुर जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरेपींचे दोन साथीदार कबीर बुढाण आणि गोपाल उर्फ टोपी बोरुडे पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रकरणात मनिष उर्फ अनिल जगनलाल साहुजी (54, रा. पवन नगर, टिव्ही सेंटर) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, साहुजी हे भुसार धान्य विकत घेऊन त्याची विक्री करतात. साहुजी यांनी चितेगाव शिवारातील निलेश गावंडे यांचे बीड-औरंगाबाद रोडवरी गोडावून किरायाने घेतले असून त्यात ते धान्य साठवून ठेवतात. 10 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास साहुजी यांनी गोडावून मध्ये तुरीच्या 80 गोण्या टाकून गोडावूनला कुलूप लावले. 7 फेबु्रवारी रोजी साहुजी हे गोडावूनवर गेले असता, गोडावून मधून दोन लाख रुपये किंमतीच्या तुरीच्या 65 गोण्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, इलियास खान, जब्बार पठाण, कबीर पठाण आणि गोपाल उर्फ टोपीने गोडावून फोडून चोरी केली. माहिती आधारे पोलिसांनी तपास करुन आरोपी इलियास खान याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याने सदरील चोरी ही जब्बार पठाण याच्या साथीने केल्याचे सांगितले. तसेच चोरलेली तुर ही रवि वाहुळे व माजलगाव (जि. बीड) येथील बाजार समितीतील निखील ट्रेडींग येथे विक्री केल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी वरील तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या तुरीच्या गोण्यांपैकी 38 गोण्या तुर जप्‍त केली.
आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी आरोपींच्या ताब्यातून उर्वरित ऐवज जप्‍त करणे आहे. आरोपींच्या दोन पसार साथीदारांना अटक करणे आहे. तसेच आरोपींनी अशा प्रकारे किती आणि कोठे चोरी केली याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्रूची विनंती न्यायालयाकडे केली.