दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात कमी

महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख

मुंबई दि ७: महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि  पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी

२ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पौंडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह  रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार ८ रुग्ण होते. महाराष्ट्राचा  क्रमांक यामध्ये देशात ६ वा होता.

संपूर्ण पारदर्शकता, आकडे लपविले नाहीत

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील  केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहित धरले नव्हते.

मृत्यूचे प्रमाण कमी

एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार  दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पौंडेचरीत ५२२, आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

कोविड वाढीचा दर तुलनेने कमी

कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता 0.10% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे 0.६१%, गोवा 0.२%, पंजाब 0.१२%, गुजरात आणि छत्तीसगड 0.११% असा दर होता.

कोविड परिस्थितीवर नियंत्रण

सक्रिय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत २९०, रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत

महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दश लक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे यश

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे आरोग्य तपासणी सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाबत जाणीवजागृती करण्यात आली. दोन टप्प्यात राबविलेली ही मोहीम कोरोना रोखण्यात फलदायी ठरली.

धारावी पॅटर्न, फिल्ड हॉस्पिटल

मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीसारख्या भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाययोजना केल्या आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे त्या भागातील संसर्ग रोखण्यात यश आले अशा या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने या पॅटर्नचे कौतुक करतानाच अन्य राज्यांनीदेखील त्याचा अवलंब करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केल्या.

महाराष्ट्राने कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याची दखल वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम्स सारख्या जागतिक माध्यमांकडून घेतली गेली. मुंबईत जम्बो कोविड सेंटर्स काही दिवसात उभारले गेले तर बीकेसीतील मैदानावर 15 ते 20 दिवसात आयसीयू सुविधा असलेले जम्बो कोविड सेंटर उभारले गेले. हे देशातील पहिले कोविड सेंटर ठरले जे मोकळ्या मैदानावर उभारले गेले.