‘चळवळीत समाजभान जोपासणारा मार्गदर्शक नेता,कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 6 : कामगार-कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्त्वाचे असते असा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राला चळवळींचा इतिहास आहे. यात कामगार-कर्मचारी चळवळीचा इतिहास लिहिताना ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांच्या कर्मचारी संघटनेच्या उभारणीची दखल निश्चितच घेतली जाईल. संघटनेची वाटचालही महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी राहील असे त्यांनी काम केले. यामुळेच त्यांना देशभरातील कर्मचारी संघटना मार्गदर्शक मानत. अनेक दशके लाखो कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करताना त्यांनी संघर्षाची धार आणि व्यापक समाजहित यांचा समतोल साधला. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक ठरेल. ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिल भैया गेले हा मोठा आघात.. लोकांसाठी जगलेला नेता गेला
कामगार नेते र. ग. कर्णिक यांच्या निधनाने राज्य कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ कामगार नेते श्री. र. ग. कर्णिक यांच्या निधनाने राज्य कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज, राज्याच्या कामगार चळवळीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई लढताना, जनतेप्रती असलेल्या जबाबदारीचेही त्यांना भान होते. राज्य कर्मचाऱ्यांचे अलोट प्रेम, अतूट विश्वास लाभलेले ते कामगार नेते होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

श्री. र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस म्हणून कर्णिक साहेबांनी प्रदीर्घ 52 वर्षे काम केले. कामगारांच्या हक्कांसाठी अनेक लढे लढले. संघर्ष करायचा, परंतु तुटेपर्यंत ताणायचं नाही, याचा विसर त्यांना कधी पडला नाही. राज्य शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये नेहमीच समन्वय, सहकार्याचे वातावरण राहीले, याचे श्रेय कर्णिक साहेबांच्या नेतृत्वालाही जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.