वैजापूर तालुक्यातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे

अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,दि.३१- आजपर्यंत भारतात 37 लक्षपेक्षा जास्त लोकांना तसेच महाराष्ट्रात 2.7 लक्ष लोकांना, तर औरंगाबाद जिल्हयात 8114 आणि वैजापूर तालुक्यामध्ये 704 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आलेली आहे. आतापर्यंत लस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही गंभीर लक्षणे दिसुन आलेली नसून वैजापूर तालुक्यातील माळी सागज गावातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू हा लसीकरणामूळे झालेला नसून ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे झालेला आहे. ही लस संपुर्ण सुरक्षीत असुन अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना लसिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा कोविड-19 लसिकरण कृतिदल समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले आहे.

आज 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता जिल्हा AEFI समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. बैठकीस उपसंचालक आरोग्य सेवा, सर्व विभागांचे तज्ञ, हृदयरोगतज्ञ, मेंदु विकारतज्ञ, भिषक, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, न्यायवैद्यकतज्ञ, जागतीक आरोग्य संघटना सल्लागार, IMA अध्यक्ष, जिल्हास्तरीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

बैठकीत वैजापूर तालुक्यातील माळी सागज गावातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यू बाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळी सविस्तर माहिती घेतली. सदरील संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यास दिनांक 29 जानेवारी रोजी कोविड लस देण्यात येवून त्यानंतर 30 मिनीट निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणताही त्रास नव्हता. 30 जानेवारी रोजी सकाळी मळमळ,छातीत दुखने सुरु झाले व आरोग्य सेविकेने प्राथमिक औषधोपचार करुन वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत केले. मात्र काही वेळाने बरे वाटल्याने सदर कर्मचारी घरीच थांबली, पण संध्याकाळी त्रास झाल्याने उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे दाखल केले असता, ECG करण्यात आला. व Acute Myocardial Infraction (तीव्र हृदयविकार झटका) निदर्शनास आला. त्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्यास खाजगी दवाखान्यात सुद्धा दाखवीण्यात आले. पुन्हा तपासणी व ECG करण्यात आला व त्यामध्ये त्यांनी वरील प्रमाणेच निदान केले. पुढील उपचारासाठी सदर महिलेस घाटी येथे संदर्भित (Refer) केले होते. परंतु त्यांनी घाटी येथे न येता त्यांच्या नातेवाईकांनी शिर्डी येथे पुढील उपचारासाठी नेतांना आज 31 जानेवारी रोजी पहाटे प्रवासात मृत्यु झाला.सदरील कर्मचाऱ्यास गेल्या वर्षभरापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सदरील आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्युबाबत शासन तसेच जागतिक आरोग्यसंघटना यांचे निकषानुसार वैज्ञानीक पध्दतीने सखोल अन्वेषण केले गेले. तसेच सदर कर्मचाऱ्याचे शवविच्छेदन दोन वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे करण्यात आले.

सदरील आरोग्य कर्मचाऱ्याचे ECG रिपोर्ट, उपचार करणाऱ्या दोन्ही तज्ञ डॉक्टरांचे अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि जिल्हास्तरीय AEFI समितीतील तज्ञांच्या अहवालानुसार एकमताने सदरील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यु Severe Acute Myocardial Infraction(तीव्र हृदयविकार झटका) यामुळे झालेला असुन याचा कोरोना लसिकरणाशी काहीही संबंध नाही., तरी ही लस संपुर्ण सुरक्षीत असुन अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सुनील चव्हाण,जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कोविड-19 लसिकरण कृतिदल समिती,औरंगाबाद यांचे मार्फत करण्यात येत आहे.