महाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली,25:महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आज या बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

Banner

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  देशातील  32 बालकांची   ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (14), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (13), जळगाव येथील अर्चित पाटील(14), पुणे येथील सोनित सिसोलेकर(13) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल(16) या बालकांचा समावेश आहे.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नांदेड येथील कामेश्वर  वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने त्यांचा जीव वाचविला आहे.

मुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली. 13 वर्षीय पर्वतारोही काम्या कार्तिकेयन ही मिशन साहस या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिर मध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.

अर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.

पुणे येथील सोनित सिसोलीकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून  त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.

नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने‍ पिकांवर येणाऱ्या यलो मोझॅक विषाणूला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.

प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.

पुरस्कार विजेत्यांनी कोरोनाच्या कठीण काळात हे पुरस्कार मिळवल्याने यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत असे पंतप्रधान म्हणाले. संवादादरम्यान पंतप्रधानांनी, वागणुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या स्वच्छता अभियानासारख्या मोहिमेतील मुलांच्या भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात जेव्हा मुलं हात धुण्यासारख्या मोहिमांमध्ये सामील झाली तेव्हा याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला आणि या मोहिमेला यश मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत त्यातील विविधताही पंतप्रधानांनी नमूद केली.

जेव्हा एखाद्या लहान कल्पनेला योग्य कृतीचा पाठिंबा मिळतो तेव्हा त्याचे परिणाम प्रभावशाली असतात असे पंतप्रधानांनी सांगितले. कल्पना आणि कृती या परस्परक्रिया असल्याने त्यांनी मुलांना कृतीवर विश्वास ठेवण्यास सांगितले. पंतप्रधानांनी मुलांना या गौरवानंतर स्वस्थ न बसता पुढील आयुष्यात चांगल्या परिणामांसाठी धडपडत राहावे असा सल्ला दिला.

पंतप्रधानांनी मुलांना तीन गोष्टी, तीन प्रतिज्ञा त्यांच्या मनावर कोरण्यास सांगितले. प्रथम, सातत्याची प्रतिज्ञा. एखादे काम करताना त्यामध्ये आळस करू नका.  दुसरी प्रतिज्ञा देशासाठी घ्या.  जर आपण देशासाठी काम केले आणि त्या प्रत्येक कामाला राष्ट्र कार्य समजलो तर ते काम स्वत: पेक्षा मोठे होईल. आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना देशासाठी काय काय करावे, याचा विचार करण्यासही पंतप्रधानांनी मुलांना सांगितले. तिसरी प्रतिज्ञा, मानवतेची.  प्रत्येक यशाने आपल्याला अधिक नम्र होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे कारण आपल्या नम्रतेमुळेच इतर व्यक्ती आपल्याबरोबर आपले यश साजरे करू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत सरकारच्या वतीने नवोन्मेश, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या क्षेत्रात असाधारण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत बाल शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणी अंतर्गत देशभरातून 32 जणांची पीएमआरबीपी-2021 साठी निवड झाली आहे.