राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Displaying WHP .jpg

मुंबई, दि. 21 : संसर्गावरील उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांनी रोगावर मात केली जाऊ शकते हे दिसून येत असते. मात्र कोविडनंतर राज्यातील सामान्य नागरिकांचा वैद्यकीय सेवेवरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. येणाऱ्या काळात राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे 21 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या विषयावर एकूण 4 दिवसांची ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट आयोजित केली आहे. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख बोलत होते.

श्री. देशमुख म्हणाले, जगभरात आता आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात गडचिरोली, उस्मानाबाद, सातारा, परभणी आणि जालना यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

आज कोविडवर लस जगभरात आली असून महाराष्ट्रात तर लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. मात्र जगभरात सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम सारखेच पाळले गेले. त्यामुळेच येणाऱ्या काळातही आपण हे नियम नवीन जीवनशैली स्वीकारताना पाळणे आवश्यक आहे.

2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी कठीण होते. मात्र 2021 हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच सकारात्मक ठरणार आहे कारण कोविड विषाणूवर लस आली असून पहिल्या टप्प्यात देशभरातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लस दिली जात आहे.गेल्या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह जगभरात आलेल्या कोविड-19 विरुध्दच्या लढाईत सर्वांत मोठा वाटा हा डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. अंबुमणी रामदास यांनीसुध्दा चांगली आरोग्य यंत्रणा किंवा आरोग्य सुविधा उभारण्याबरोबरच आपल्या नागरिकांना येणाऱ्या काळात चांगल्या पायाभूत सुविधा, प्रदूषणमुक्त वातावरण देणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सुदृढ आरोग्य यंत्रणा उभारण्यावर केंद्र आणि राज्य शासन भर देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.चांगले पाणी, योग्य न्यूट्रीशन्स, हायजीन आणि चांगले वातावरण म्हणजे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. कोरोनाच्या काळात भारत सरकारने चांगली भूमिका स्विकारून सामाजिक आरोग्य सांभाळले आहे. एकीकडे परिवर्तनीय वातावरण, ग्लोबल चेंज आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे सृष्टीवर वेगवेगळे आजार येतच राहणार आहेत. अशावेळेस वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन व नवनिर्मिती होणे गरजचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय संशोधनासाठी वेगळे बजेट तयार केले आहे. या देशाने दिलेले आयुर्वेद आणि योगामुळे मानव आरोग्यपूर्ण राहिल त्यामुळे त्याचा अधिक लाभ आपल्या जीवनात घ्यावा. वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच मानवसंसाधनाची कमी पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत.”

या हेल्थ पार्लमेंटमध्ये बोलताना डॉ. ओक म्हणाले ,डॉ. संजय ओक म्हणाले,“ कोरोनाच्या काळानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल झालेले आहेत. त्याचा परिणाम आपोआपच समाजावर  पडतो. वैद्यकीय क्षेत्रात देशाच्या स्थितीत मोठे बदल करावे. येथे हजार नागरिकांच्या मागे १ डॉक्टर व १ नर्से आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात  वाढ होणे गरजचे आहे. त्यासाठी डॉक्टर, नागरिक, नर्सेस, विद्यार्थी, पॉलिसी मेकर्स आणि राजकारणी यांच्या योग्य सहयोगाने वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडवू शकतो.”
राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ कोरोनाच्या काळात देशात ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढली होती. त्याला नियंत्रण करण्यासाठी सरकारने योग्य पाऊले उचलून चांगले नियोजन केले होते. त्यामुळे रुग्णांची बरे होण्याचे प्रमाणही वाढले. आज देशात मेडिकल टुरिझम वाढत चालले आहे. अशा वेळेस वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थेनेही  गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा. या पार्लमेंटमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घडामोडीचा उहापोह घेता येईल. ज्याचा लाभ सामाजिक आरोग्य चांगले करण्यासाठी होईल.”

देशभरातील आरोग्य सेवेत सुधारणा करणे, सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा वाजवी दरात उपलब्ध करण्यावर येणाऱ्या काळात कसा भर देणे आवश्यक आहे हाच या पार्लमेंटचा मुख्य विषय होता.यावेळी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडियो कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधतांना म्हणाले, देशात आता आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. त्यानुसार संपूर्ण क्षेत्रात प्रगती होतांना दिसत आहे. सिरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती करून संपूर्ण जगाला ती पुरवित आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठे संशोधन होतांना दिसत आहे. तंत्र ज्ञानामुळे ईसीजी सारख्या खिशात ठेवणार्‍या मशीनची निर्मिती करून मानवाला देणगी दिली आहे.डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बी.एस.कुचेकर स्वागतपर भाषण केले.

पुण्यातील विश्वराज हॉस्पिटल, तळेगाव येथील माईर्समायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसांचे वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट भरविले गेले आहे. आज सकाळी या पार्लमेंटचे ऑनलाईन उद्घाटन झाले. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी या पार्लमेंटचे आयोजन केले आहे. सिक्कीमचे आरोग्यमंत्री डॉ. मणिकुमार शर्मा, जम्मू काश्मीरच्या आरोग्यमंत्री असिया नक्काश, खासदार डॉ.अंबुमणी रामदास, खासदार डॉ. सुभाष भामरे, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. आदिती कराड यावेळी उपस्थित होते.