लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सज्ज रहावे–सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 20 :कोविड प्रतिबंधात्मक उपायांमध्ये लसीरण महत्वाचे असून त्यादृष्टीने जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात लसीकरण मोहीमेंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. बैठकीस जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. मुजीब, डॉ, एम.आर. लढ्ढा  यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.

कोविड लसीकरणानंतर होणारा त्रास हा प्राथमिक स्वरूपाचा असून कोणत्याही लसीकरणानंतर काही लोकांना अशा प्रकारचा त्रास होण्याची उदाहरणे आहेत. या त्रासाची कुणीही भीती बाळगू नये. कारण सौम्य स्वरूपाचा हा त्रास योग्य औषधोपचारानंतर नियंत्रणात आलेला आहे. तरी जनतेने लसीकरणाबाबत कोणतीही शंका बाळगू नये तसेच यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेत लसीकरण मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

यावेळी लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी लस घेलतल्यानंतर ज्या-ज्या लोकांना त्रास झाला आहे तो त्रास सौम्य स्वरूपाचा असून उपचारानंतर सर्वांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगितले.