घनकचरा प्रक्रिया केंद्र’ शहराच्या स्वच्छतेसाठी पुरक -पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद, दिनांक 16 : शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते. त्या पार्श्वभूमीवर घनकचरा प्रक्रिया केंद्र औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल होत असल्याने शहराच्या स्वच्छतेला तो पुरक ठरेल असे, पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले.
पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया (150 मे. टन) केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, रेणुकादास वैद्य, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, शहरातील सन 2052 पर्यंत पाणी योजनेचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी केले असून याकरिता 1680 कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी येणार असल्याचे सांगून श्री. देसाई यांनी नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर येऊ न देण्याची जबाबदारी पार पाडावी आणि विघटन होणारा ओला कचरा मनपाच्या घंटागाडीत जमा करावा, असे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
सुरुवातीला पडेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी देखील केली.
घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चिकलठाणा (150 मे. टन), पडेगाव (150 मे. टन) , नारेगाव (150 मे. टन) येथे कचऱ्यावर प्रक्रिया केंद्राचे काम पुर्णत्वास असून पडेगाव येथे प्रक्रिया शेड, प्लॅटफॉर्म, संरक्षण भिंत, लिचडटँक, ऑफीस इमारत इत्यादी कामे पुर्ण झाली आहे. पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया बाबतची मशिनरी बसविण्यात आली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय प्रास्ताविकात दिली.
कांचनवाडी येथील घनकचरा बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण
महानगरपालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या कांचनवाडी येथील बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, मनपा आयुक्त आस्तीक कुमार पांडेय, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह संबंधित मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पात दररोज 30 मे. टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन मिथेन गॅस निर्मिती करण्यात येणार आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे लोकार्पणपालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे लोकार्पण करण्यात आले.जालना रोडवरील अमरप्रित हॉटेल चौक येथे उभारण्यात आलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे लोकार्पण प्रसंगी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्यासह सर्व संबंधित मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. |