नामविस्तार दिनी नागरिकांनी गर्दी टाळावी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Image may contain: one or more people and people sitting

औरंगाबाद, दिनांक 09 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापण दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले की शहरात कोरोना विषाणुचा प्रसार नियंत्रणात आला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नामविस्तार दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम, सभा, रॅली आदी कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून आरोग्याची काळजी घेत घरुनच अभिवादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अंतिम बैठक सोमवारी 11 जानेवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सचिन निकम, रि.पा.ई.चे जिल्हा अध्यक्ष संजय ढोकळ, पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे गुणरत्न सोनवणे, भिमशक्ती संघटनेचे संतोष भिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.