अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई दि. ८ : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रूपये नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.१० हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रती हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.

या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.