आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्या -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 18 प्रकरणे पात्र
Image may contain: 1 person, sitting

औरंगाबाद, दि.29 : शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत त्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला तत्काळ मदत मिळावी यासाठी कार्यवाही जलद पद्धतीने करावी, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

तसेच बैठकीतील दाखल झालेल्या एकूण 19 प्रकरणांवर सविस्तर चर्चा केली. त्यातील 18 प्रकरणे मंजूर करून एका प्रकरणावर फेरचौकशी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रारंभी श्री. जाधवर यांनी बैठकीत दाखल प्रकरणांची माहिती सादर केली.