नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा!

मुंबई, दि.24 : नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे, असेही श्री.ठाकरे यांनी म्हटले आहे.

नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला मानणारी असून त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून येशूंचा मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारल्यास समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा. कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले आहे.