शहीद जवान नागनाथ अभंग लोभे यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लोभे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली

लातूर/निलंगा, दि. 23:- भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना वाहनाचा अपघात होऊन दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी उमरगा तालुका निलंगा येथील जवान नागनाथ अभंग लोभे यांचा इतर चार जवानांसह सियाचीन येथील दरीत पडून जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी उमरगा(हाडगा) तालुका निलंगा येथे शहीद जवान नागनाथ अभंग लोभे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे पुतणे विष्णू लोभे यांनी मुखाग्नी दिला.     

उमरगा येथील शहीद जवान नागनाथ अभंग लोभे यांच्या पार्थिवावर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवान नागनाथ लोभे यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार अभिमन्यू पवार,  अशोकराव पाटील निलंगेकर,  पोलीस अधिक्षक निखिल पिंपळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, अभय साळुंके, श्रीशैल्य उटगे,  किरण जाधव, विजयकुमार पाटील, पंडीतराव धुमाळ, अविनाश रेश्मे, दगडू साळुंके, संजय दोरवे, सुरेश बिराजदार, बाळासाहेब शिंगाडे,  अजित माने आदीची उपस्थिती होती.

तसेच उमरगा व परिसरातील ग्रामस्थ तसेच लातूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होऊन शहीद जवान नागनाथ अभंग लोभे… अमर रहे…. अशा घोषणा दिल्या.    

 

भारतीय सैन्य दला मार्फत सैन्य दलाच्या पथकाने तसेच जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस पथकाने ही हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद जवान नागनाथ अभंग लोभे यांना मानवंदना दिली.       शहीद जवान नागनाथ अभंग लोभे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ-बहीण, आई-वडील, असा परिवार आहे.