प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ

६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 23 : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता 63 ऐवजी 99 पुरस्कार दरवर्षी दिले जातील. या वर्षापासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत सन 1967 पासून कृषिक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार व शेतीनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे.

कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठी पात्रतेचे निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये तरुण शेतकऱ्यांना वाव देण्यासाठी नव्याने ‘युवा शेतकरी पुरस्कार’ व उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी ‘उत्कृष्ट कृषि संशोधक’ पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे. पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करून निवड आणि शिफारशी बाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि एकसूत्रीपणा येण्यासाठी  बदल करण्यात आल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

यापूर्वी कृषी विभागामार्फत एकूण 63 पुरस्कार देण्यात येत होते. त्यात काही पुरस्कारांची संख्या वाढवून नव्याने 36 पुरस्कारांची वाढ करण्यात आली असून आता 99 पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागातून व सर्व जिल्ह्यातून शेतकरी निवडले जातील याची खबरदारी घेण्यात आली आहे.

पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार १, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- ८, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारांची संख्या ५ वरून ८ करण्यात आली आहे. सेंद्रीय शेती पुरस्कार ८, उद्यान पंडित पुरस्कार ८, शेतीमित्र पुरस्कार ३ वरून ८ करण्यात आले असून शेतीनिष्ठ पुरस्कारांची संख्या २५ वरून ४० करण्यात आली आहे. सेवारत्न पुरस्कार २ वरून ९ करण्यात आले तर नव्याने समावेश करण्यात आलेला युवा शेतकरी पुरस्कार ८ जणांना दिला जाईल. उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराची संख्या १ आहे.