बिनतारी संच,सहा वर्षानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
औरंगाबाद,प्रतिनिधी:
भांगशी माता गड येथील पोलिसांच्या वायरलेस रिपीटर इमारतीमधुन बिनतारी संच हॅन्डसेट, दोन बॅटरी चार्जर असा सुमारे 15 हजार 176 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना 28 नोव्हेंबर 2014 रोजी घडली होती. प्रकरणात तब्बल सहा वर्षानंतर त्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 8 हजार 471 रुपये किंमतीचा बिनतारी संच पोलिसांनी जप्त केला आहे. अस्लम युसूफ मिर्झा (35, रा. माणिकनगर ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव असुन त्याला 4 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी मंगळवारी (दि. 2) दिले.
प्रकरणात बिनतारी संदेश विभागाचे तत्कालीन निरीक्षक नितीन मधुसुदन गावंडे (52) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर 2014 रोजी सकाळी 8 वाजता भांगशी माता गड येथील व्यवस्थापक पवार यांनी गावंडे यांना फोन केला. व वायरलेस रिपीटरच्या इमारतीची खिडकी उघडी असल्याचे सांगितले. माहिती मिळताच गावंडे यांनी सहकार्यांसह भागसीमाता गडा जवळल वायरलेस रिपीटर सेंटर गाठले. तेंव्हा चोरट्याने खिडकीतुन प्रवेश करुन रिपीटर कक्षामधील 8 हजार 471 रुपयांचा बिनतारी संच हॅन्डसेट , एक हजार 723 रुपये किंमतीची एसएमपीएस बॅटरी चार्जर व 4 हजार 976 रुपये किंमतीची बॅटरी चार्ज र असा सुमारे 15 हजार 176 रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान पोलिसांनी तपास करुन आरोपी अस्लम मिर्झा याला 1 जून रोजी रात्री गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्ह्यात चोरलेला उर्वरित ऐवज आरोपीकडुन जप्त करणे आहे. तसेच गुन्ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याबाबत देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.