पृथ्वीचे संरक्षण: निरंतर आणि सर्वंकष मूल्यांकन दृष्टीकोन

जी-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनुषंगिक कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

सन्माननीय,

महोदय,

आज, आपण वैश्विक महामारीच्या उद्रेकामुळे होत असलेल्या परिणामांपासून आपले नागरिक आणि अर्थव्यवस्था यांच्या बचावासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्याच जोडीला आपण हवामान बदलाच्या विरोधात लढा देण्यावरही लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. हवामान बदलाच्या समस्येचा लढा देताना केवळ स्वतःपुरता किंवा अगदी मर्यादित विचार करून चालणार नाही तर त्यासाठी एकात्मिक, सर्वंकष आणि समग्र मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाशी संसुगत आणि एकरूप होऊन राहण्याच्या आमच्या परंपरेपासून प्रेरणा घेऊन तिला अनुसरून आणि सरकार कटिबद्ध असल्यामुळे भारताने कमी कार्बन उर्त्सजन आणि हवामान-संवेदनक्षम विकास पद्धतींचा स्वीकार केला आहे.

भारत केवळ आपल्या पॅरिस कराराच्या उद्दिष्टांची पूर्तता करीत नाही तर त्यापेक्षाही जास्त कार्य करीत आहे,  हे सांगताना मला आनंद होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी भारताने अनेक क्षेत्रात ठोस पावले उचलली आहेत. आम्ही एलईडी दिवे लोकप्रिय केले आहेत. यामुळे दरवर्षाला 38 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होत आहे. देशातल्या 80 दशलक्षाहून जास्त घरांना उज्ज्वला योजनेतून स्वयंपाकाचा गॅस पुरवठा केला आहे त्यामुळे स्वयंपाक घरे आता धूरमुक्त झाली आहेत. जागतिक स्तरावर ही सर्वात मोठी स्वच्छ ऊर्जा योजना आहे.

एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्या वनक्षेत्रामध्ये विस्तार होत आहे. देशामध्ये वन्यजीव- सिंह आणि वाघ यांची संख्या वाढतेय. सन 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर भूमीची होणारी धूप थांबवून तिचा दर्जा सुधारण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आम्ही अर्थव्यवस्था चक्राकार असावी यासाठी प्रोत्साहन देत आहोत. भारतामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मेट्रोमार्ग, जलमार्ग आणि इतर संपर्क साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त पर्यावरण स्वच्छ ठेवणारी कार्यक्षम आणि सुविधापूर्ण वाहतूक साधने देशात आहेत. 175 गिगा वॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे आम्ही लक्ष्य निश्चित केले असून ते सन 2022 पूर्वीच पूर्ण करणार आहोत. आता आम्ही सन 2030 पर्यंत 450 गिगा वॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निश्चित केले असून त्याच्या पूर्तीसाठी मोठे पाऊल टाकले आहे.

सन्माननीय,

महोदय,

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, वेगाने विस्तार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेपैकी एक आहे.  आत्तापर्यंत यामध्ये 88 राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कोट्यवधी  डॉलर्स जमा करून त्याव्दारे हजारो सहभागींना प्रशिक्षण देणे आणि संशोधनासाठी प्रोत्साहन देणे तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्याच्या योजना आहेत. आयएसए कार्बन उर्त्सजन कमी करण्यासाठी योगदान देईल. या आघाडीचे आणखी एक उदाहरण म्हणजे – आपत्ती निवारण पायाभूत सुविधेसाठी मदत करणे.

जी-20 मधील 9 राष्ट्रांसह 18 देश आणि 4 आंतरराष्ट्रीय संघटना यापूर्वीच आघाडीमध्ये सहभागी झाल्या आहेत. सीडीआरआयने पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता आणून काम सुरू केले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान या विषयाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. गरीब देशांवर त्याचा खूप मोठा, विशेष परिणाम होतो. त्यामुळे अशी आघाडी महत्वपूर्ण ठरते.

सन्माननीय,

महोदय,

नवीन आणि शाश्वत तंत्रज्ञानामुळे संशोधन आणि नवसंकल्पना यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आपण सहकार्य आणि सहयोगाच्या भावनेने कार्य केले पाहिजे. विकसनशील जगाला जर तंत्रज्ञान आणि अर्थपुरवठा यांचा भक्कम आधार मिळाला तर संपूर्ण जगाची वेगाने प्रगती होऊ शकणार आहे.

सन्माननीय,

महोदय,

मानवतेच्या प्रगतीसाठी, प्रत्येक व्यक्तीची भरभराट झाली पाहिजे. श्रम म्हणजे उत्पादनासाठी वापरला जाणारा एक घटक आहे, असे मानण्यापेक्षा मानवाच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. असा आपण दृष्टिकोन ठेवला तर तो आपल्या या ग्रहाच्या संरक्षणासाठी सर्वात उत्तम हमी देणारा ठरेल.

धन्यवाद.