एसईबीसी वगळून अन्य प्रवर्गाच्या तलाठी यांना नियुक्त्या देण्याचे आदेश

औरंगाबाद
एसईबीसी वगळून उर्वरित तलाठीपदाच्या उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२०  पर्यंत नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय  गंगापूरवाला आणि न्या.आर.जी.अवचट यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.     

Bombay High Court (Aurangabad Bench) - Home | Facebook

       

राज्य शासनाने २०१९ साली  प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली.  बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे . परंतु बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. म्हणून श्रीराम येवले व इतर ४२ उमेदवारांनी याचिका दाखल केली होती.राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्त्या करू नयेत असे ४ फेब्रुवारी २०२०  च्या शासन निर्णयाद्वारे निर्देश दिले होते . दरम्यान ९ सप्टेंबर २०२० च्या पत्रान्वये शासनाने अहमदनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या नसलेल्या उमेदवारांना तलाठीपदी नियुक्ती देण्याचा आदेश दिला होता. असे असताना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त्या दिल्या नाहीत. 

निवड झालेल्या उमेदवारांपैकी ७ उमेदवार एसइबीसी प्रवर्गातील आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली असल्यामुळे काय निर्णय घ्यावा याबाबत त्यांनी राज्यशासनाकडे मार्गदर्शन मागविले होते .९ सप्टेंबरच्या  अंतरिम आदेशानुसार एसइबीसी उमेदवार  वगळून इतरांना नियुक्त्या का दिल्या नाहीत याची विचारणा खंडपीठाने केली होती. त्यानंतर वेळोवेळी सरकारतर्फे निवेदने करण्यात आली . मात्र , नियुक्त्या दिल्या नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली.