डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले – मंत्री अशोक चव्हाण

रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 31 : बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.

डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत मंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वृत्त दुःखद – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

श्री . मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशिम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे सान्निध्य लाभले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. नुकतेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.

डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराजांचे बंजारा समाज, व्हीजेएनटी आरक्षण लढ्यातील योगदान, त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील तसेच पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.