पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आजचे (25 ऑक्टोबर 2020) आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.

आज विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा  उत्सव आहे. या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याचा  हा उत्सव, असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव आहे. परंतु, त्याबरोबरच, हा एक प्रकारे संकटांवर धैर्यानं मिळवलेल्या विजयाचाही उत्सवही आहे. आज, आपण सर्व जण खूप संयमानं जीवन जगत आहात, एका मर्यादेत राहून सण, उत्सव साजरे करत आहात, म्हणून, जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आमचा विजयही अगदी निश्चित आहे. पूर्वी, दुर्गादेवीच्या मंडपात, देवीमाँच्या दर्शनासाठी इतकी मोठी गर्दी होत असे की, एकदम, मेळ्यासारखं वातावरण तयार होत असे,परंतु यंदा असं होऊ शकलं नाही. पूर्वी, दसऱ्याचा  दिवशीही मोठमोठे मेळावे आयोजित केले जात, परंतु यावेळी त्यांचं संपूर्ण स्वरूपच वेगळं आहे.  रामलीलेचा सण, त्याचं फार मोठं आकर्षण होतं, परंतु त्यातही काही नं काही प्रमाणात बंदी लागू झाली आहे. पूर्वी, नवरात्रिमध्ये, गुजरातच्या गरब्याचा ठेका सर्वत्र व्यापून असायचा. यावेळी, मोठमोठे गरबा आयोजन बंद आहेत. अजून, पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. अजून ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. कोरोनाच्या या संकटकाळात, आम्हाला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे.

मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.

मित्रांनो, सणांच्या या जल्लोषातच लॉकडाऊनच्या काळाचीही आठवण ठेवली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये, आम्हाला समाजातील आमच्या त्या साथीदारांच्या आणखी निकट जायचं आहे, ज्यांच्याशिवाय आमचं जीवन अत्यंत अवघड झालं असतं- स्वच्छता कर्मचारी, घरात काम करणारे बंधुभगिनी, स्थानिक भाजी विक्रेते, दूध विक्रेते, सुरक्षा रक्षक, या सर्वांची आमच्या जीवनात काय भूमिका आहे, ते आम्हाला चांगलं जाणवलं आहे. अवघड काळात, हे आपल्याबरोबर होते, आम्हा सर्वांच्या समवेत होते. आता, आमच्या उत्सवात, आमच्या आनंदातही, त्यांना आमच्याबरोबर ठेवायचं आहे. माझा आग्रह आहे की, जितपत शक्य असेल, त्यांना आपल्या आनंदात जरूर सामिल करून घ्या.

कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच त्यांना सहभागी करून घ्या, मग आपण पहा, आपला आनंद किती पटींनी वाढतो ते.

मित्रांनो, आम्हाला आमच्या जिगरबाज सैनिकांनाही लक्षात ठेवायचं आहे, जे या सणासुदीच्या दिवसांमध्ये सीमेवर देशाच्या रक्षणासाठी पाय रोवून उभे आहेत. भारतमातेची सेवा आणि संरक्षण करत आहेत. त्यांना स्मरणात ठेवूनच आम्हाला आमचे सण साजरे करायचे आहेत.  आम्हाला आमच्या घरात एक दिवा, भारतमातेच्या या शूरवीर पुत्र आणि कन्यांच्या सन्मानार्थ लावायचा आहे. मी, आमच्या वीर जवानांना हे सांगू इच्छितो की, भलेही आपण सीमेवर तैनात आहात, परंतु पूर्ण देश आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी प्रार्थना करत आहे.  ज्यांचे पुत्र आणि कन्या आज सीमांवर तैनात आहेत, त्या कुटुंबाच्या त्यागाला मी नमन करतो. जो कुणी प्रत्येक जण देशाशी संबंधित कोणत्या नं कोणत्या जबाबदारीमुळे आपल्या घरी नाही, आपल्या कुटुंबापासून दूर आहे, मी, त्यांचे मनापासून आभार मानतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आम्ही लोकलसाठी व्होकल होत आहोत, तेव्हा जग आपल्या स्थानिक उत्पादनांचा चाहतं होत आहे.  आमच्या कैक उत्पादनांमध्ये जागतिक म्हणजे ग्लोबल होण्याची खूप मोठी शक्ति आहे. जसं एक उदाहरण आहे – खादीचं. दीर्घकाळापासून खादी ही एक साधेपणाची ओळख बनून राहिली आहे, परंतु, आज आमची खादी, पर्यावरण स्नेही कापड म्हणून ओळखली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीनं, ही खादी शरीरस्नेही आहे, सर्व हवामानातही उपयुक्त आहे आणि आज खादी ही फॅशन शैली म्हणून तर वापरली जात आहेच. खादीची लोकप्रियता तर वाढत आहेच, परंतु त्याबरोबरच, जगात अनेक ठिकाणी, खादी तयारही केली जात आहे.  मेक्सिकोमध्ये एक ठिकाण आहे ओहाका. या क्षेत्रात अनेक गावं अशी आहेत की जिथं, स्थानिक ग्रामीण लोक, खादी विणण्याचं काम करतात. आज, इथली खादी ओहाका खादी म्हणून प्रसिद्धी पावली आहे. ओहाकामध्ये खादी पोहचली कशी, याची कथाही काही कमी रंजक नाही.  प्रत्यक्षात, मेक्सिकोचा एक युवक मार्क ब्राऊन यानं एकदा महात्मा गांधी यांच्यावरील एक चित्रपट पाहिला. ब्राऊन हा चित्रपट पाहिल्यावर बापूंच्या कार्यानं इतके प्रभावित झाले की ते भारतात बापूंचा आश्रम पहाण्यास आले आणि बापूंच्या बाबतीत त्यांनी आणखी सखोल जात त्यांच्या कार्याबद्दल जाणून, समजून घेतलं. तेव्हा ब्राऊन यांना याची जाणिव झाली की, खादी हे काही केवळ एक कापड नाही तर संपूर्ण जीवनपद्धती आहे. खादीशी कशा प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरता यांचं तत्वज्ञान जोडलेलं आहे, हे समजल्यानं ब्राऊन अत्यंत प्रभावित झाले. इथपासूनच ब्राऊन यांनी मेक्सिकोत जाऊन खादीचं काम सुरू करायचा निश्चय केला. त्यांनी, मेक्सिकोच्या ओहाकामध्ये ग्रामीण नागरिकांना खादीचं काम शिकवलं, त्यांना प्रशिक्षित केलं आणि आज ओहाका खादी एक ब्रँड बनली आहे. या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर असं लिहिलं आहे- द सिंबॉल ऑफ धर्मा इन मोशन म्हणजे गतिशील धर्माचं प्रतिक. या संकेतस्थळावर मार्क ब्राऊन यांची अत्यंत मनोरंजक मुलाखतही वाचायला मिळेल.ते सांगतात की, सुरूवातीला लोकांना खादीच्या बाबतीत शंका होत्या, परंतु नंतर लोकांचा खादीतला रस वाढला आणि खादीची बाजारपेठ तयार झाली. ते म्हणतात की, या गोष्टी रामराज्याशी जोडलेल्या आहेत, जेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण करता, तेव्हा लोकही तुमच्याशी जोडले जाण्यासाठी पुढे येतात.

मित्रांनो,  दिल्लीच्या कॅनॉट प्लेसवर असलेल्या एका खादीच्या दुकानात यावेळी गांधी जयंतीच्या दिवशी एकाच दिवसात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक खादीची खरेदी झाली. अशा तऱ्हेने, कोरोनाच्या काळातही खादीचे मास्क अत्यंत लोकप्रिय होत आहेत. देशात अनेक ठिकाणी स्वयंसहाय्यता गट आणि दुसर्या संस्था खादीचे मास्क बनवत आहेत. उत्तरप्रदेशात, बाराबंकीमध्ये, एक महिला आहे-सुमनदेवीजी. सुमनजी यांनी स्वयंसहाय्यता गटातल्या आपल्या महिला साथीदारांच्या समवेत मिळून मास्क बनवण्यास सुरूवात केली.  हळूहळू अन्य महिलाही या कार्यात जोडल्या गेल्या, आता त्या सर्वजणी मिळून हजारो खादीचे मास्क बनवत आहेत. आमच्या स्थानिक उत्पादनांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या समवेत नेहमी संपूर्ण तत्वज्ञान जोडलं गेलेलं असतं.

माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आम्हाला आमच्या वस्तुंबद्दल अभिमान असतो तेव्हा, जगातही त्यांच्याप्रति उत्सुकता वाढत असते. जसे आमचं अध्यात्म, योग, आयुर्वेदानं सर्व जगाला आकर्षित केलं आहे. आमचे अनेक खेळ जगाला आकर्षित करत आहेत.  आजकाल, आमचा मल्लखांबसुद्घा, अनेक देशांमध्ये प्रचलित होत आहे. अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली, तेव्हा, त्यांना याला इतकं यश मिळेल, याचा अंदाजही नव्हता. अमेरिकेत आज, अनेक ठिकाणी, मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत. अमेरिकेतला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या खेळाशी जोडले जात आहेत, मल्लखांब शिकत आहेत.आज, जर्मनी असेल, पोलंड असेल, मलेशिया असेल, अशा जवळपास 20 देशांमध्ये  मल्लखांब खूप लोकप्रिय होत आहे. आता तर, याची, जागतिक विजेतेपद स्पर्धाही सुरू करण्यात आली आहे, ज्यात, कित्येक देशांचे प्रतिस्पर्धी भाग घेतात. भारतात तर प्राचीन काळापासून असे अनेक खेळ खेळले जात आहेत, जे आमच्या अंतर्गत, असाधारण विकास करतात. आमचं मन, शरीर संतुलनाला एका वेगळ्याच मितीवर घेऊन जातात. परंतु कदाचित, आमच्या नव्या पिढीचे युवक साथीदारांना,  मल्लखांब हा खेळ तितकासा माहित नसण्याची शक्यता आहे. आपण इंटरनेटवर त्याचा शोध घेऊन जरूर पहा.

मित्रांनो,  आमच्या देशात किती प्रकारचे मार्शल आर्ट आहे. माझी इच्छा आहे की आमच्या युवक साथीदारांनी त्यांच्याबाबतीतही जाणून घ्यावं, ते शिकावेत, आणि, बदलत्या काळानुसार त्यात नवीन संशोधनही करावं. जेव्हा जीवनात मोठी आव्हानं नसतात, तेव्हा व्यक्तिमत्वातले सर्वश्रेष्ठ गुणही बाहेर येत नाहित. म्हणून आपण स्वतःला नेहमी आव्हान देत रहा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, असं म्हटलं जातं की, शिकणं हेच विकास होणं असतं. आज, मन की बात मध्ये, मी, आपली ओळख अशा एका व्यक्तिशी करून देईन जिच्यात एक वेगळ्याच प्रकारचं झपाटलेपण आहे. हे झपाटलेपण आहे दुसऱ्यांबरोबर वाचन आणि शिकून आनंदाचं वाटप करण्याचं.  हे आहेत पोन मरियप्पन. पोन मरियप्पन तमिळनाडूच्या तुतुकुडीमध्ये रहातात. तुतुकुडीला पर्ल सिटी म्हणजे मोत्यांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. हे शहर कधी काळी पांडियन साम्राज्याचं एक महत्वपूर्ण केंद्र होतं. इथं रहाणारे माझे मित्र पोन मरियप्पन, केशकर्तनाच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत आणि एक केशकर्तनालय चालवतात. हे खूप छोटं सलून आहे. त्यांनी एक अनोखं आणि प्रेरणादायक काम केलं आहे. आपल्या सलूनच्या एका भागातच त्यांनी वाचनालय बनवलं आहे.

जर एखादी व्यक्ति सलूनमध्ये आपली पाळी येईपर्यंत प्रतिक्षा करत असताना काही वाचत असेल, आणि जे वाचलं त्याबाबतीत काही लिहून ठेवत असेल, तर तो पोन मरियप्पन त्या ग्राहकाला पैशात सवलत देतात. आहे नं मजेदार. या. पोन मरियप्पन यांच्याशी बातचीत करू या.

प्रधानमंत्रीः पोन मरियप्पन जी, वणक्कम… नल्ला इर किंगडा?

(प्रधानमंत्रीः पोन मरियप्पनजी, वणक्कम.. आपण कसे आहात?)

(पोन मरियप्पनः माननीय प्रधानमंत्रीजी, वणक्कम (नमस्कार)).

प्रधानमंत्रीः वणक्कम, वणक्कम. उंगलक्के इन्द लाईब्रेरी आयडिया येप्पडी वंददा

(प्रधानमंत्रीः वणक्कम, वणक्कम. आपल्याला या पुस्तकालयाची कल्पना आहे, ती कशी सुचली?)

(पोन मरियप्पन यांच्या उत्तराचा हिदी अनुवाद मी आठवी इयत्तेपर्यंत शिकलो आहे. त्याच्यापुढे मी कौटुंबिक परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही. जेव्हा मी शिकलेल्या लोकांकडे पहातो, तेव्हा मला एक प्रकारची कमतरता जाणवत होती. म्हणून, माझ्या मनात आलं की आम्ही एक पुस्तकालय का सुरू करू नये, आणि त्याचा, खूप लोकांना लाभ होईल, हीच गोष्ट माझ्यासाठी प्रेरणा बनली.)

प्रधानमंत्रीः उंगलक्के येन्द पुत्तहम पिडिक्कुम?

(प्रधानमंत्रीः आपल्याला कोणतं पुस्तक जास्त आवडतं?

(पोन मरियप्पनः मला तिरूकुरूल खूप आवडतं.)

प्रधानमंत्रीः उंगकिट्ट पेसीयदिल येनक्क. रोम्बा मगिलची. नल वाड तुक्कल

(प्रधानमंत्रीः आपल्याशी बोलल्यामुळे मला अत्याधिक आनंद झाला आहे. आपल्याला खूप शुभेच्छा.

(पोन मरियप्पनः मलाही माननीय प्रधानमंत्र्यांशी बोलताना खूप खूप प्रसन्न वाटत आहे.)

प्रधानमंत्री  नल वाड तुक्कल.(अनेकानेक शुभेच्छा.)

पोन मरियप्पनः धन्यवाद प्रधानमंत्री जी.

प्रधानमंत्री  थँक यू.

आम्ही आताच पोन मरियप्पन यांच्याशी चर्चा केली. पहा, कसे ते लोकांच्या डोक्याची सजावट  करताना त्यांना आपल्या जीवनाची सजावट करण्याचीही संधी देत आहेत. थिरूकुरूलच्या लोकप्रियतेच्याबाबतीत ऐकून खूप चांगलं वाटलं.  थिरूकुरूलच्या लोकप्रियतेबद्दल आपण सर्वांनीही ऐकलं. आज भारताच्या सर्व भाषांमध्ये थिरूकुरूल उपलब्ध आहे. संधी मिळाली तर अवश्य वाचलं पाहिजे. जीवनासाठी ते एक प्रकारे ते मार्गदर्शक आहे.

मित्रांनो, आपल्याला हे जाणून आनंद होईल की संपूर्ण भारतात अनेक लोक असे आहेत की ज्यांना ज्ञानाच्या प्रसार केल्यानं अपार आनंद मिळतो. ये लोक असे आहेत की प्रत्येक जण वाचण्यासाठी प्रेरित होईल यासाठी नेहमी तत्पर असतात.  मध्यप्रदेशच्या सिंगरौली इथल्या शिक्षिका, उषा दुबे जींनी तर आपल्या स्कूटीलाच फिरत्या पुस्तकालयात परिवर्तित केलं आहे. त्या दररोज आपल्या फिरत्या वाचनालयासहित कोणत्या नं कोणत्या गावात पोहचतात आणि तिथल्या मुलांना शिकवतात. मुलं त्यांना प्रेमानं पुस्तकवाली दीदी म्हणतात. यावर्षी अरूणाचल प्रदेशच्या निरजुलीच्या रायो गावात एक स्वयंसहाय्यता वाचनालय बनवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात, इथल्या मीना गुरूंग आणि दिवांग होसाई यांना जेव्हा त्या भागात वाचनालय नाही, असं समजलं तेव्हा त्यांनी त्याच्या निधीपुरवठ्यासाठी हात पुढे केला. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की या वाचनालयासाठी सदस्यत्व वगैरे काही नाही. कुणीही व्यक्ति दोन आठवड्यांसाठी पुस्तक  घेऊन जाऊ शकतो. वाचल्यानंतर पुस्तक परत करावं लागतं. हे वाचनालय आठवड्याचे सातही दिवस आणि  चोविस तास खुलं असतं. आसपासचे पालक त्यांची मुलं पुस्तकं वाचण्यात गुंग झाले आहेत, हे पाहून खुष आहेत.

खासकरून, जेव्हा शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. चंडीगढमध्ये एक एनजीओ चालवणारे संदीप कुमार जी यांनी एका मिनीव्हॅनमध्ये फिरतं ग्रंथालय तयार केलं आहे, याच्या माध्यमातनं गरिब मुलांना वाचण्यासाठी विनामूल्य पुस्तकं दिली जातात. यासह, गुजरातच्या भावनगरमध्येही दोन संस्थांची मला माहिती आहे की ज्या अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहेत.  यापैकीच एक आहे विकास वर्तुल ट्रस्ट. ही संस्था स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सहाय्यकारी आहे. हा ट्रस्ट 1975 पासून काम करत आहे आणि पाच हजार पुस्तकांसह 140 हून अधिक मासिकं उपलब्ध करून देते. अशीच एक संस्था पुस्तक परब आहे. हा नाविन्यपूर्ण संशोधनाचा प्रकल्प आहे, ज्यात साहित्यिक पुस्तकांबरोबरच अन्य पुस्तकंही निःशुल्क उपलब्ध करून देतात. या वाचनालयात अध्यात्मिक,  आयुर्वेदिक उपचार आणि अन्य कित्येक विषयांशी संबंधित पुस्तकांचाही समावेश आहे. आपल्यालाही जर अशा काही प्रयत्नांच्या बाबतीत माहिती असेल तर माझा आग्रह आहे की, समाजमाध्यमांवर तुम्ही त्याची जरूर माहिती द्या. हे उदाहरण केवळ पुस्तक वाचणं किंवा वाचनालय सुरू करणं यापुरतंच मर्यादित नाही तर, नव्या भारताच्या भावनेचं प्रतिक आहे, ज्यामुळे समाजाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक स्तरातील लोक नवीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा स्विकार करत आहेत. गीतेत म्हटलं आहे

न हि ज्ञानेन सदृष्यं पवित्र मिह विद्यते

अर्थात, ज्ञानासारखं, जगात काहीच पवित्र नाही .  ज्ञानाचा प्रसार करणारे, त्यासाठी

प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व महोदयांचं मी, मनापासून अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो  काही दिवसातच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, 31 ऑक्टोबर, आपण सर्व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करू. मन की बात मध्ये याच्या आधीही आपण सरदार पटेलांवर विस्तारपूर्वक बोललो आहोत. त्या महान व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंवर आपण चर्चा केलेली आहे. वैचारिक सखोलता, नैतिक साहस, राजनैतिक विलक्षणता, कृषी क्षेत्राचे  सखोल ज्ञान आणि राष्ट्रीय एकतेबद्दल समर्पण भाव-  खूप कमी लोक सापडतील की ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतके सगळे गुण एकत्रित झालेले असतील.

सरदार पटेल यांची विनोदबुद्धी दाखवणारी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का? जरा कल्पना करा, लोह पुरुषाचे चित्र! राजेरजवाड्यांच्या  बरोबर चर्चा करत आहेत,  पूज्य बापूजींच्या  बरोबर लोक अभियानाची व्यवस्था करत आहेत, त्याचबरोबर इंग्रजांशी  पण लढत आहेत आणि ह्या सगळ्यात देखील त्यांची विनोदबुद्धी पूर्णपणे जागृत असायची !

बापूजींनी सरदार पटेल यांच्या विषयी म्हटलं होतं की त्यांच्या विनोदी गप्पा गोष्टी मला एवढ्या हसवतात की हसून हसून माझे  पोट दुखायला लागते  आणि असे  एकदा नाही तर दिवस भरात  कित्येकदा होते. याच्यात आपल्यासाठी पण एक शिकवण आहे. ती अशी की  कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी.  विनोद बुद्धी  आपल्याला सहज/ स्वाभाविक  तर ठेवतेच  पण आपल्या समस्येवर आपण मार्ग देखील शोधू शकतो.   सरदार साहेबांनी हेच तर केले  होते.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,  सरदार पटेल यांनी आपले  संपूर्ण जीवन, देशाच्या एकतेसाठी समर्पित  केले होते.  त्यांनी भारतीय जनमानसाला, स्वतंत्रता आंदोलनाच्या सोबत  जोडले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडल्या/ स्वातंत्र्य आंदोलनाचा भाग बनवल्या. त्यांनी राजेरजवाड्यांना आपल्या राष्ट्रात सामील  करण्यासाठी काम केले.  ते प्रत्येक भारतीय मनात, ‘ विविधतेतून एकता’ हा मंत्र जागवत राहिले.

मित्रांनो आज आपल्याला, आपली वाणी, आपला व्यवहार, आपले  काम, प्रत्येक क्षणी त्या सर्व गोष्टींना पुढे न्यायचे  आहे ज्या आम्हाला एक करतील. ज्या देशाच्या एका भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात, अगदी दूर दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांच्या बाबत, आपलेपणाचा आणि सहजतेचा भाव निर्माण करतील.

आपल्या पूर्वजांनी अनेक शतकांपासून नेहमीच असे प्रयत्न केले आहेत.  आता असे बघा, केरळ मध्ये जन्मलेल्या पूज्य आदी शंकराचार्यांनी भारताच्या चारी दिशांना चार महत्त्वपूर्ण मठांची स्थापना केली. उत्तरेतला बद्रिकाश्रम, पूर्वमध्ये पुरी, दक्षिणेत शृंगेरी आणि पश्चिमेला  द्वारका. त्यांनी  श्रीनगरची यात्रा देखील केली होती. म्हणूनच तिथे एक शंकराचार्य हिल/ टेकडी आहे.

ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांची साखळी भारताला एका सूत्रात बांधते. त्रिपुरा पासून गुजरात पर्यंत, जम्मू-काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत असलेली आमची श्रद्धास्थाने आम्हाला एक करतात. भक्तिमार्ग चळवळ संपूर्ण भारतात, एक लोक चळवळ बनली, ज्यांनी आम्हाला भक्तीच्या माध्यमातून एकत्र केले.

एकतेची ताकद असणाऱ्या गोष्टी आमच्या रोजच्या जीवनात देखील कशा मिसळल्या  गेल्या आहेत?!! कोणत्याही अनुष्ठानाच्या आधी वेगवेगळ्या नद्यांना आवाहन केले  जाते.  यात अगदी सुदूर उत्तरेत असलेल्या सिंधू नदीपासून, दक्षिण भारताची जीवनदायिनी असलेल्या कावेरी नदी पर्यंत, सगळ्या नद्या सामील आहेत.  नेहमी स्नान करताना, आपल्याकडे मोठ्या पवित्र भावनेने, एकतेचा मंत्रच तर म्हटला जातो!

गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वती I

नर्मदे सिन्धु कावेरि जलेSस्मिन् सन्निधिं कुरु II

अशाच प्रकारे शिखांच्या पवित्र स्थळात नांदेड साहेब गुरुद्वारा पण आहे आणि पटना साहेब गुरुद्वारा पण आहे. आमच्या शीख गुरूंनी देखील,  आपल्या जीवन आणि आपल्या सत्कार्यांच्या  माध्यमातून एकतेची भावना दृढ केली.

मागच्या शतकात, आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विभूती होऊन गेल्या, ज्यांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून एकत्र केले.

मित्रांनो,

unity is power, unity is strength

unity is progress, unity is empowerment

United we will scale new heights

तसेच अशाही काही शक्ती कार्यरत आहेत ज्या  नेहमीच आमच्या मनात संशयाचे बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाने देखील, अगदी प्रत्येक वेळी, त्यांच्या या वाईट उद्देशांना सडेतोड उत्तर दिलेले  आहे.  आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी,  प्रयत्नपूर्वक, आपल्या छोट्या छोट्या कामांमधून, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व  सुंदर रंगात साकार करायचे   आहे.  त्यात एकतेचे नवे रंग भरायचे आहेत आणि प्रत्येक नागरिकाला हे भरायचे आहेत! यासंदर्भात मी आपल्याला एक  वेबसाईट /संस्थळ बघण्याची विनंती करेन ekbharat.gov.in  (एक भारत डॉट गव डॉट इन) ह्या संस्थळावर, आपली राष्ट्रीय एकतेची मोहिम पुढे नेणारे अनेक प्रयत्न आपल्याला बघायला मिळतील.

त्यातीलच एक आकर्षक कोपरा आहे, आजचे वाक्य हा!!  या भागात  रोज एक वाक्य वेगवेगळ्या भाषेत कसे बोलले जाते तेआपण शिकू शकतो. आपण या संस्थळावर आपला सहभाग देखील द्या. जसे की वेगवेगळ्या राज्यातील, संस्कृतीतील, वेगवेगळ्या  विशेष पाककृती असतील. स्थानिक स्तरावरील साहित्यापासून म्हणजे धान्य आणि मसाल्यांपासून त्या बनवल्या जातात. आपण या स्थानिक अन्नाच्या पाककृतीला, स्थानिक घटक पदार्थांच्या नावासकट, एक भारत श्रेष्ठ भारत, या संस्थळावर शेअर करू शकतो का? लिहू शकतो का?

एकता आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी याच्याहुन चांगला उपाय आणखी कोणता असू शकेल?

मित्रांनो, या महिन्याच्या 31 तारखेला, मला केवडियामध्ये  ऐतिहासिक अशा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ स्थानावर होणाऱ्या, अनेक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.  आपण देखील  नक्की सहभागी व्हा.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,  31 ऑक्टोबरला आपण वाल्मिकी जयंती देखील साजरी करतो. मी महर्षी वाल्मिकींना नमन करतो आणि ह्या विशेष प्रसंगी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. महर्षी वाल्मिकींचे महान विचार, करोडो लोकांना प्रेरणा देतात, शक्ती प्रदान करतात. ते विचार लाखो-करोडो गरीब आणि दलितांसाठी एक मोठी आशा आहेत. त्यांच्यात आशा आणि विश्वास ह्यांचा संचार होतो.

ते म्हणतात की “माणसाची इच्छाशक्ती जर त्याच्या बरोबर असेल, तर तो कोणतेही काम अगदी सहज करू शकतो”. ही इच्छाशक्तीच आहे  की जी अनेक तरुणांना, असामान्य कार्य करण्याची शक्ती देते. महर्षी वाल्मिकी ह्यांनी सकारात्मक विचारांवर भर दिला आहे. त्यांच्यासाठी सेवा आणि माणसाचा आत्मसन्मान सर्वश्रेष्ठ आहे. महर्षी वाल्मिकी यांचे आचार विचार आणि आदर्श आज नव्या भारताच्या आमच्या संकल्पाची प्रेरणा आहेत आणि त्यासाठी मार्गदर्शक देखील आहेत. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रामायणासारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, आम्ही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहू.

31 ऑक्टोबरला भारताच्या पूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना आपण गमावले.  मी आदरपूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो  आज काश्मीरमधील पुलवामा, संपूर्ण देशाला शिक्षण देण्यात एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आज देशभरात मुले आपला गृहपाठ करतात, नोट्स काढतात, तेव्हा कुठे न कुठे याच्यामागे पुलवामाच्या लोकांचे कठोर परिश्रम आहेत. कश्मीर खोरे, संपूर्ण देशभरातील, जवळजवळ 90 टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टी ची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामा चा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, ह्या क्षेत्रात, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे. खरेतर पुलवामा च्या पेन्सिल सलेट्स राज्यांच्या मधली अंतर कमी करत आहेत.

खोऱ्यातील चिनारच्या लाकडामध्ये उच्च आर्द्रता प्रमाण असते तसेच कोमलता असते. त्यामुळे पेन्सिल तयार करण्यासाठी ते सर्वात सुयोग्य  ठरते. पुलवामा मधील उक्खू हे गाव पेन्सिल ग्राम ह्या नावानेच ओळखले जाते. इथे पेन्सील स्लेट निर्माण करणारे अनेक गट आहेत, जे रोजगार उपलब्ध करुन देत आहेत आणि यात खूप मोठ्या संख्येने महिला काम करत आहेत.

मित्रांनो जेव्हा पुलवामा मधील लोकांनी  काहीतरी नवे करायचे ठरवले, काम करण्याची जोखीम उचलली आणि स्वतःला कामासाठी पूर्णपणे समर्पित केले, तेव्हाच पूलवामाची ही ओळख निर्माण होऊ शकली.

अशाच मेहनती लोकांपैकी एक आहेत, मंजुर अहमद अलाई. आधी मंजूर भाई लाकूड कापणारे एक सामान्य मजूर होते. पण आपल्या येणाऱ्या पिढयांना  गरीबीत जगायला लागू  नये म्हणून मंजूर भाईंना  काहीतरी नवे  करायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकली आणि सफरचंद ठेवण्यासाठीची लाकडी खोकी तयार करण्याचे युनिट सुरू केले.

ते आपल्या या छोट्याश्या उद्योगात व्यस्त असतानाच त्यांना माहिती मिळाली कि पेन्सिल तयार करण्यासाठी, poplar वूड म्हणजेच चिनारच्या लाकडाचा उपयोग करणे सुरू झाले आहे. ही माहिती मिळाल्यावर मंजूर भाईंनी, आपल्या उद्योगशीलतेचा  परिचय देत, पेन्सिल तयार करणाऱ्या काही प्रसिद्ध गटांसाठी, पोपलार वुडन बॉक्स म्हणजे चिनारच्या लाकडी खोक्यांचा पुरवठा सुरू केला.  मंजूर भाईंना  हे खूप फायदेशीर वाटले,  आणि त्यांची कमाई देखील चांगली वाढू लागली.

हळूहळू त्यांनी पेन्सिल स्लेट तयार करण्यासाठी लागणारी  यंत्रसामुग्री देखील घेतली आणि त्या नंतर त्यांनी देशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना पेन्सिल सलेट्सचा पुरवठा सुरू केला. आज मंजूर भाईंच्या या उद्योगाची उलाढाल करोडोंमध्ये आहे आणि ते जवळपास दोनशे लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.

आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून संपूर्ण देशवासीयांच्या वतीने मी मंजूर भाईंच्यासकट पुलवामातील  मेहनती बंधू-भगिनींची आणि त्यांच्या परिवारांची प्रशंसा करतो. तुम्ही सगळ्यांनी देशातील तरुण मनांना शिक्षण देण्यासाठी, आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो  लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञान अधिष्ठित सेवा वितरणाचे, अनेक प्रयोग आपल्या देशात झाले आणि आता असे राहिलेले नाही की केवळ खूप मोठ्या तंत्रज्ञान आणि पुरवठा कंपनीच हे काम करू शकतात.

झारखंड मधील बचत गटातील काही महिलांनी देखील हे काम करून दाखवले आहे. या महिलांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाज्या आणि फळे थेट घरोघर पोचवली. या महिलांनी आजीविका फार्म फ्रेश नावानी एक ॲप बनवले ज्यावरून लोक अगदी सहज भाज्या मागवू शकतात. या संपूर्ण प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना आपल्या भाज्या आणि फळांचा चांगले मूल्य मिळाले आणि लोकांना ताज्या भाज्या मिळाल्या. तिथे आजीविका फार्म फ्रेशची कल्पना खूप लोकप्रिय होते आहे.लॉक  डाऊन मध्ये त्यांनी पन्नास लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीच्या फळे आणि भाज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या.

मित्रांनो शेती क्षेत्रात,  नव्या नव्या शक्यता निर्माण होताना पाहून, आमचे तरुण देखील ह्यात, मोठ्या संख्येने जोडले जात आहेत.  मध्यप्रदेशातील बडवानीमधील  अतुल पाटीदार यांनी इ प्लॅटफॉर्म फार्म कार्ड च्या माध्यमातून आपल्या भागातील चार हजार शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून जोडले आहे. हे शेतकरी अतुल पाटीदार यांच्या इ प्लॅटफॉर्म फार्म कार्ड च्या माध्यमातून शेतीचे सामान, खते, बियाणे कीटकनाशके, बुरशीनाशके  इत्यादीं घरपोच मागवू शकतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत त्यांना आवश्यक असणारे सामान पोहोचत आहे.  या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधुनिक कृषी उपकरणे देखील भाड्याने मिळतात. लॉकडाऊनच्या काळात देखील, या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना कापूस आणि इतर भाज्यांची बियाणे असलेली, हजारो पाकिटे पोचवली गेली. अतुल जी आणि त्यांचा चमू शेतकऱ्यांना तंत्रज्ञान विषयी जागरूक करतो आहे, ऑनलाइन पेमेंट आणि खरेदी शिकवतो आहे.

मित्रांनो, अशातच महाराष्ट्रातील एका घटनेकडे माझे लक्ष गेले. तिथे एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीने मक्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला. कंपनीने या वेळी शेतकऱ्यांना मालाच्या  किमती शिवाय, एक वेगळा बोनस देखील दिला. शेतकऱ्यांना सुखद आश्चर्य वाटले. जेव्हा त्यांनी कंपनीला विचारले तेव्हा कंपनीने सांगितले की भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार, शेतकरी  भारतात कुठेही आपले उत्पादन विकू शकतो आणि त्याची त्यांना चांगली किंमत मिळते आहे. म्हणून त्यांनी असा विचार केला की हा जास्तीचा मिळालेला नफा, शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यायला हवा. त्या नफ्यावर शेतकऱ्यांचा देखील हक्क आहे. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बोनस दिला आहे.

मित्रांनो, बोनस आत्ता कदाचित कमी देखील असेल.  पण ही सुरुवात खूप मोठी आहे. यामुळे आपल्याला कळते आहे की तळागाळातील शेतकऱ्यांच्या हिताचे, अनेक बदल होण्याच्या कशा प्रकारच्या शक्यता, या नव्या शेतीविषयक कायद्यात आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो  आज मन की बात च्या माध्यमातून देशवासीयांच्या यशोगाथासंबंधी,  आमच्या देशाच्या, आमच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या परिमाणावर आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली.

आमच्या देशात अनेक प्रतिभावंत लोक आहेत. जर तुम्हालाही असे लोक माहिती असतील तर त्यांच्या विषयी बोला, लिहा आणि त्यांच्या यशोगाथा सर्वांपर्यंत पोहोचवा.

येणार्‍या सण, उत्सवानिमित्त आपल्याला आणि आपल्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा! पण एक लक्षात ठेवा, सणांच्या काळात विशेष करून लक्षात ठेवा, की मास्क  घालायचा आहे, हात साबणाने धुत राहायचे  आहे आणि दोन गज अंतर ठेवायचे आहे!

मित्रांनो पुढच्या महिन्यात पुन्हा आपल्याशी ‘मन की बात’ होईल! 

अनेक अनेक धन्यवाद!!