शेत पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी व अंबड तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्याशेतपिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पाहणी

जालना दि. 18 :- आज दि 18 ऑक्टोबर 2020 रोजी घनसावंगी व अंबड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेत व शेतपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अंबड तालुक्यातील मौजे बेलगाव व घनसावंगी तालुक्यातील रायरा येथील शेतात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त एकाही शेतीमधील पिक व शेत पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिका-यांनी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या पाहणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार नरेंद्र देशमुख, राम रोडगे, रघुनाथ तौर, कल्याणराव सपाटे, बन्सीधर शेळके, भागवत रक्तारे, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मूग याबरोबरच फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून सर्व यंत्रणांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात पंचनाम्याची कारवाई पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी वेगाने पंचनामे करण्यात येत आहेत.अतिपाण्यामुळे सोयाबीन, तुरीचे पीक संपूर्ण जळून जाणार असून कापसाचे उत्पादनही प्रचंड घटणार आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून विम्याची रक्कम मिळवून देण्याबरोबरच एन.डी.आर.एफ.मार्फतशेतकऱ्यांना तातडीने मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना आपण दिली असून जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत देण्याची विनंतीही करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.