आंध‘, तेलंगणात अतिवृष्टी, 21 जणांचा मृत्यू
रेल्वे पूलही पाण्याखाली, घरांचे प्रचंड नुकसान
हैदराबाद,
बंगालच्या उपसागरातली कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे तेलंगणाच्या सर्वच भागांना मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, यात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. रस्तेच नाही, तर रेल्वे पूलही पाण्याखाली आला होता. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंध‘प्रदेशातही 7 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
मागील 24 तासांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण शहरात पाणी साचले. हैदराबादच्या चंद्रायनगुट्टा भागात काही घरांच्या भिंती कोसळल्याने तीन लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्राकडे वाटचाल
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तेलंगणाकडून महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासोबतच विजांपासूनही सावध राहण्याचे आवाहन हवामान खात्याने नागरिकांना केले आहे. राज्यात मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघरसह संपूर्ण कोकण प्रदेशात, तसेच विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.