सामुहिक प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

औरंगाबाद, दिनांक 02 – कोविड-19 नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी राज्यस्तरीय मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. औरंगाबादला कोविडमुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारीअंतर्गत लोकचळवळीचा भाग म्हणून जिल्हयातील सर्व नागरिकांनी प्रतिज्ञा घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता ‘सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रम’ घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे.

या अनुषंगाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनांनी कार्यालय स्तरावर 06 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रतिज्ञा घ्यावी. यामध्ये खासगी संस्था, नागरिकांनी देखील नियोजित वेळेस कार्यालय, घर किंवा इतर ठिकाणाहून सहभागी होऊन प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

या कार्यक्रमातून कोविडचा फैलाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायजर, मास्कचा वापर, अनावश्यक गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आदी नियमांचे कटाक्षाने पालन करून “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” या मोहिमेतील सामूहिक प्रतिज्ञा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे. या कार्यक्रमाचा अनुपालन अहवाल कार्यालयांनी छायाचित्रांसह सात ऑक्टोबर रोजी सायं. पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या [email protected] मेल वर पाठवावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे.