‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी

जिल्ह्यात 1559 आरोग्‍य पथकाकडून 78.70 टक्के कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

लातूर,दि.1 :- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची प्लस ऑक्सी मिटर व थर्मोमीटरच्या साह्याने आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या तपासणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वतःची तपासणी करून घेतली व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या घरी आलेल्या आरोग्य पथकांना योग्य ते सहकार्य करून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी केले.

राज्यात कोरोनावर नियंत्रणासाठी व राज्य कोरोना मुक्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 10 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल तर दिनांक 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून जिल्हास्तरीय माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लातूर शहरात महापालिकेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी केली जात असून तसेच कोविड बाबत प्रबोधनही केले जात आहे.

आज ह्याच अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य पथकातील शेख शमाबी मुजीब (आशा वर्कर), रणदिवे अंजली शिवाजी(आशा सहाय्यक) यांनी  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत त्यांच्या पत्नी सौ. सोनम जी. श्रीकांत, मुलगी शाश्वती जी. श्रीकांत यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.

लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 25 लाख 99 हजार 446 इतकी असून यामध्ये 18 लाख 66 हजार 910 ग्रामीण लोकसंख्या तर 7 लाख 32 हजार 536 इतके शहरी लोकसंख्या आहे. तर जिल्ह्याची एकूण कुटुंब संख्या चार लाख 81 हजार 486 इतकी आहे या सर्व कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1559 इतक्या आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आलेली असून ग्रामीण भागासाठी 1359 व शहरी भागासाठी 200 पथके कार्यरत आहेत. या पथकामध्ये एकूण 4677 इतके आरोग्य कर्मचारी व अधिकारी नियुक्त केलेले आहे.

जिल्ह्यात एकूण 3 लाख 78 हजार 920 कुटुंबाचे आरोग्य तपासणी झालेली असून झालेल्या सर्वेक्षण ची टक्केवारी 78.70 टक्के इतकी आहे. या संरक्षणाअंतर्गत एकूण 25 हजार 728 रुग्णांना विविध प्रकारचे आजार आढळून आले यामध्ये को बी पॉझिटिव रुग्णांची संख्या 2332 तर सारे आजाराचे रुग्ण 742 इतके आढळले तर ILI आजाराचे 2697 व इतर आजाराचे रुग्ण 19957 इतके आढळलेले आहेत.

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आजपर्यंत सर्वेक्षण न झालेल्या कुटुंबांनी आरोग्य पथक  घरी आल्यानंतर त्या पथकास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.