“जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा”, नाना पटोलेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदे शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देण हे शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारचं कर्तव्य आहे. परंतु २० किमी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद क राल तर याद राखा. असा इशारा देखील पटोले यांनी सरकारला दिला. सरकार जिल्हा परिषदेच्या जवळपास १५ हजार शाळा बंद करुन समुह शाळा सुरु करणार असल्याच्या बातमी प्रसिद्ध झालेल्या आहेत. या शाळांमधून १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर २९ हजारांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत, असं म्हणत शाळा बंद करण्यावर भाजपा चांगलाच समाचार नाना पटोले यांनी घेतला.

वाड्या वस्त्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी राज्यातील अनेक महापुरुषांनी शाळा सुरु केल्या. पणहे सरकार गरिब, मागास, वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गाव, वस्तिवरील शाळा बंद केल्यास लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी दूर पायपीट करावी लागेल. दुर्गम भागात वाहनांची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत २० किलोमीटरच्या क्षेत्रात एकच शाळा ठेवण्याचा निर्णय निर्बुद्धपणाचा व कसलाही विचार न करता घेतलेला दिसत आहे.

यापूर्वी देखील समुह शाळांचा प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला. आता पुन्हा नवीन शिक्षण धोरणात समुह शाळेचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे १५ हजार शाळा बंद होऊन या शाळांमध्ये शिक्षण घेणारे सामान्य कुटुंबातील मुलं-मुली शिक्षणापासून वंचित होतील. ग्रामीम, दुर्गम व वाड्या वस्त्यांवरील मुलांना खाजगी महागडे शिक्षण परवडणारे नाही.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी तातडीने खुलासा करणं गरजेचं आहे. काँग्रेस याप्रश्नी आवाज उठवेल. व गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.