‘सरकार पडेल तेव्हा बघू’ : फडणवीसांचे सूचक विधान!

मुंबई :माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तूळात गरमागरम चर्चा झाल्या. महाविकास आघाडी सरकार कोसळणार आहे की काय याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. मात्र, या प्रकरणी दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरणे येऊ लागल्यानंतर या प्रकरणातील हवा काहीशी कमी झाली आहे. परंतू, फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाराष्ट्रातील राजकीय डावपेच कसा असेल याची एक चूणूक दिसून आली.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे वृत्तपत्र ‘सामना’च्या मुलाखतीसंदर्भात विचारणा करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यावेळी ही मुलाखत UNCUT असेल तसेच विना एडीट करता ही मुलाखत दाखवली जावी, अशी अट मी ठेवली होती. त्यावर आमची चर्चा झाली. महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवर आम्ही चर्चा केल्या. मात्र, यात कुठलीही राजकीय चर्चा अद्याप झालेली नाही. ज्या प्रकारे हे सरकार कोरोनाचा विषय हाताळत आहे. सुडाचे राजकारण करत आहे त्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आपली बाजू मांडत जनतेच्या मागण्या ठेवत आहोत.”
 
फडणवीसांचे ‘हे’ वक्तव्य दाखवते पुढील राजकारणाची चुणूक
हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला कुठलाही रस नाही. हे सरकार अंतर्गत विरोधांमुळेच पडेल, अशी सरकारे कधीही पाच वर्षे टीकत नाहीत, या आशयाची वक्तवे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली आहेत. मात्र, रविवारी राऊतांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण देत असताना फडणवीस यांनी केलेले वक्तव्य राज्याच्या पुढील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच भाजपच्या पुढील वाटचालीसाठीही महत्वाचे ठरते.
ते म्हणतात, “राज्य सरकार अंतर्गत विरोधाने पडेल. आम्हाला ते पाडण्यात किंचितही रस नाही. मात्र, ज्यावेळी हे सरकार पडेल, तेव्हा पर्यायी सरकार उभे करण्यासाठी काय करायचे याबद्दलही आम्ही विचार करू.” फडणवीस यांच्या या वक्तव्या प्रमाणे त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची सूचक विधाने केली होती. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशी सरकारे पाच वर्षे टीकतात का, असा प्रतिप्रश्न केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले तर पर्यायी सरकार तयार करण्यासाठी भाजपची रणनिती कशी असेल हे भविष्यात जर काही राजकीय नाट्य रंगले तर पहायला मिळेल.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच अचानक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे सरकार कोसळणार की काय, अशी भीती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटात आहे, त्याबद्दल राऊत आणि फडणवीसांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे ही बैठक घेण्यात आली. तब्बल पाऊणतास सुरू असलेल्या चर्चेत नेमके मुद्दे काय होते हे मात्र, गुलदस्त्यात आहे. मात्र, राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा पवारांनी अचानक वर्षा येथे कुठलेही पूर्वनियोजन नसताना मुख्यमंत्र्यांसह चर्चा केल्याने राजकीय वर्तूळात चर्चा होत आहे. या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही या बद्दल स्पष्टीकरणे दिले आहे. युती संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले तर संजय राऊत यांनी ‘सामना’च्या मुलाखतीसाठी फडणवीसांना विचारणा केली, असे म्हणत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र भाजपनेही सरकार पाडण्यासाठी आम्हाला कुठलीही उत्सुकता नाही, आमची ती संस्कृती नाही, अशी भूमीका घेतली आहे.
 
सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात भेट झाल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आले. महाआघाडी सरकार पडण्याशी संबंध नाही असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणतात, देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असतेच असे नाही. मागील नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असे म्हणलो नाही. मात्र हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार अस आम्ही म्हणतोय.आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही,” असे म्हणत त्यांनी या भेटीबाबत माहिती दिली.
 
दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत या भेटीमागे कोणतेही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणतात “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.” असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला.
 
फडणवीस-राऊत भेटीनंतर पवार अलर्ट : घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
 
दरम्यान,सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.मात्र, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *