जनता कर्फ्यूची नागरिकांवर सक्ती नाही – जिल्हाधिकारी मुगळीकर
परभणी, दि. 25 :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 26 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा आदेश पारीत करण्यात आलेला नाही. तसेच या जनता कर्फ्यूची नागरिकांवर कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता जनतेने स्वयंस्फूर्तीने योग्य त्या उपाययोजना करणे जसे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी न करणे इत्यादी अभिप्रेत आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूमध्ये ज्यांना स्वयंस्फूर्तीने आस्थापना बंद ठेवायच्या असतील त्यांनी बंद ठेवण्यास हरकत नाही. ज्यांना आस्थापना खुल्या ठेवायच्या असतील त्यांना कोणतीही बंदी नसून ते आस्थापना खुल्या ठेवू शकतात. तसेच प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. याची सर्वांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.