कोरोना उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागात पुरवठा करा – मंत्री डॉ. शिंगणे

ऑक्सिजन पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे 
कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई दि.22 : कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम भाग जसे विदर्भातील काही जिल्हे बुलडाणा, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद या दुर्गम भागातही रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करण्यात यावे. यासाठी  उत्पादक व वितरकांनी  आवश्यक उपाययोजना  करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठयाबाबत आढावा बैठक  झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनिल भारद्वाज यांच्यासह सिप्ला, डॉ. रेड्डी, जुबीलंट, झायडस या औषध उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. शिंगणे म्हणाले, राज्यातील रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्या आणि उपलब्ध साठा याचा सातत्याने आढावा घेऊन  ज्या भागात रुग्ण आहेत त्या भागात रेमडेसिवीर  इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. रुग्णांना हे औषध जवळच्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध होईल याची माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयातील कंट्रोल रुममधून संनियंत्रण करावे.  याबाबतची माहिती जनतेला देण्यात यावी. राज्यात उत्पादन होणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या साठ्याबाबत तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्याचे दैनंदिन वितरण व वापर याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात उपलब्ध व्हावी.

वितरकांनी राज्यात रुग्णांच्या संख्येचे वाढते प्रमाण विचारात घेता त्यांना प्राप्त होणाऱ्या साठ्यापैकी जास्तीत जास्त पुरवठा महाराष्ट्रात करावा. दुर्गम भागातही रुग्णांना सहजतेने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठीची यंत्रणा उभारण्यावर भर देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दि. 22 सप्टेंबर रोजी राज्यात 15,779 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून दि. 30 सप्टेंबर पर्यंत सुमारे 1,50,256 इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती उत्पादकांनी दिली. त्यामुळे येत्या काळात वितरण नियोजन योग्य रितीने केल्यास तुटवडा भासणार नाही.

कोरोना उपचारात सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन  न देता रुग्णाला कोणत्या टप्प्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे यासाठीचे आवश्यक प्रोटोकॉल ठरवून देण्याचे कार्य आरोग्य विभागाच्या टास्क फोर्समार्फत केले जावे यासाठी मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्री.शिंगणे यावेळी म्हणाले.

गरजू रुग्णांना इंजेक्शन देण्याबाबत अडचण येत असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक  १८ ०० २२२ ३६५  वर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी केले आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची भविष्यातील गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवावे. तसेच इतर व्यावसायिक कारणांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व वैद्यकीय कारणांसाठी लागणारे ऑक्सिजन याच्या वितरणाचे योग्य नियोजन करावे. असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात  त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनिल भारद्वाज यांच्यासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार उपस्थित होते.

राज्यातील कोविड-१९ च्या ११ टक्के रुग्णांच्या उपचारासाठी  ऑक्सिजनची आवश्यकता भासते. इतर रुग्णांना लागणारे ऑक्सिजन मिळून सुमारे ८०० मेट्रिक टन एवढे ऑक्सिजन लागते. सध्या  एक हजार मे.टन पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येऊ नये, मात्र वाहतूक व वितरण व्यवस्थेतील अडचणीमुळे काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतूकदार यांनी वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजुंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

येत्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवुन उत्पादकांनी त्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल याबाबत नियोजन करावे तसेच योग्य वितरण प्रणाली राबविण्यात यावी. राज्यातील ऑक्सिजन टँकर व्यतिरिक्त इतर गॅसेससाठी वापरले जाणारे टँकर सुध्दा ऑक्सिजन वाहतूकीसाठी वापरण्याचे  निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले .

नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुम

कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. याद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियंत्रणासह आता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा नियंत्रित केली जाणार आहे.  राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला  उपलब्ध करुन दिला जातो. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८ ०० २२२ ३६५ तसेच ०२२ २६५९२३६४ हा लॅण्डलाईन क्रमांक कार्यान्वित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *