राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद,३२ हजार रुग्ण घरी
आज बरे झालेल्यांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या निम्म्यावर-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.२१: राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले.
आज राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह ( २०.७१ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.