माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा – जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

औरंगाबाद, दि.19 :-कोविड-19 च्या नियंत्रणासाठी  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम उपयुक्त ठरणारी असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांच्या सोबत लोकहभाग महत्त्वाचा  आहे. ‌त्यादृष्टीने सर्वसमावेशकपणे प्रभावीरीत्या मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालय येथे   “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीमेबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, अतिरिक्त आयुक्त मनपा ब. भि. नेमाने, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी  भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. मिरकले,   शिक्षण अधिकारी (प्रा.) एस. पी. जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या डॉ. नीता पाडळकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी उल्हास गंडाळ, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ ,यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण  म्हणाले, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीमेतून व्यापक स्वरुपात जनजागृती करून नागरिकांना आरोग्य बाबतच्या खबरदारी घेण्यासाठीचे मार्गदर्शन आणि आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामध्ये नागरिकांनी सक्रियपणे सहभागी होण्यावर प्राधान्याने भर देऊन लोकसहभागातून ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करावयाची आहे.कारण लोकसहभाग हा मोहीमेला यशस्वी करण्यासाठीचा कणा आहे. तसेच या मोहिमेत केल्या जात असलेल्या सर्वक्षणात आरोग्य विभागाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे . त्यादृष्टीने पथकाच्या प्रशिक्षणावर विशेष भर द्यावा. कोरोनापासून बचाव करत आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करणारी ही मोहीम जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहायक ठरणारी आहे , त्यादृष्टीने सर्वांनी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या.

       “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीमेंतर्गत 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी जिल्ह्यात एकूण 2306 आरोग्य पथके तयार करण्यात आली असून शहरात 379 तर ग्रामीण भागात 1927 पथके सर्वक्षण करणार आहे. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान SpO2 तपासणे तसेच Comorbid Condition कोमॉर्बीड कंडीशन आहे का याची माहिती घेण्यात येईल. ताप, खोकला, दम लागणे, SpO2 कमी अशी कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic फिव्हिर क्लिनिक मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic फिव्हिर क्लिनिक मध्ये कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील. कोमॉर्बीड कंडीशन असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल.

            तसेच घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जाणार आहे. शहरात मनपातर्फे तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच मोहीमेच्या व्यापक यशासाठी इतर यंत्रणा, लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *