हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 16 :- ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद मुक्त करण्यासाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल, सैनिकांबद्दल  उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हैदराबाद मुक्ती संग्रामातील शहीद वीरांच्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिना’निमित्त मुक्ती संग्रामातील वीरांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाड्याचा इतिहास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे. मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या संघर्षाच्या, शौर्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज नेतृत्वाखाली लढला गेलेला हैदराबाद मुक्ती संग्राम हा देशाचा समांतर स्वातंत्र्यलढाच आहे. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात लढलेल्या वीरांचा देश नेहमीच ऋणी राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामातील वीरांचा गौरव केला. येणाऱ्या भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *