माळेगावच्या भीषण अपघातात पाच जणांसह १९० मेंढ्या जागीच मृत, दोन जण गंभीर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ झालेल्या अपघातात पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

राजस्थान येथील एक मालमोटर (एचआर-५५-एजे-३१११ ) २०० हूनअधिक मेंढ्या भरून हैदराबादकडे निघाला होता. या मालमोटर चालकासह चौघेजण केबिनमध्ये बसले होते. एक व्यक्ती पाठीमागे मेंढ्यांसोबत बसला होता. माल मोटर गुरुवारी (२५ मे) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ आली असताना उड्डाणपुलाजवळ माल मोटरचालकाला डूलकी लागली. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभे असलेल्या मालमोटरवर त्याचे वाहन आदळले.

या अपघातामध्ये मालमोटरमधील तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेत असताना मध्येच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी तात्काळ कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या अपघातामधील मृतांमध्ये सलमान आली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीरमेवाती, आलम अली यांचा समावेश आहे. यामध्ये एक जण राजस्थानमधील असून इतर मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.