२००० रुपयांची नोट छापण्याला पंतप्रधान मोदींचा विरोध होता; माजी प्रधान सचिवाचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली :-आरबीआयने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करता येणार असल्याचे देखील रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. दोन हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी २०१६ च्या काळात केलेल्या नोटबंदीचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, दोन हजार  रुपयांची नोट चलनात आणायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजिबात इच्छा नव्हती. मात्र, त्यांना इच्छा नसताना या निर्णयाला संमती द्यावी लागली होती, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. विशेष म्हृणजे त्यांनी हे वक्तव्य २००० रुपयांची नोट चलनातून बाद केल्यानंतर केले आहे.

 मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार रुपयांची नोट चलनात आण्याच्या बाजून नव्हते. नोटबंदी मर्यादित वेळेत करायची असल्याने त्यांनी अनिच्छेने या निर्णयाला परवानगी दिली.” अशी माहिती त्यांनी दिली. नृपेंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, “२००० रुपयांच्या नोटेला मोदी यांनी  कधीही गरीबांची नोट मानली नाही. या नोटेचे व्यवहार मुल्यापेक्षा होर्डिंग मुल्य वाढणार आहे. याबाबत त्यांना माहिती होती.” असे देखील मिश्रा यांनी म्हटले आहे.

 ते पुढे म्हणाले की, “काळा पैसा नाहीसा करणे हा त्यामागचा उद्देश असला तरी जास्त नोटा बाजारात आल्याने त्यांना साठवण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा या निर्णयाला विरोध होता. नोटबंदीच्या निर्णयानंतर मर्यादित कालावधीसाठी २००० रुपयांचा ची नोट चलनात आणण्याचा एकमेव पर्याय असल्याने त्यांनी अनिच्छेने या निर्णयाला संमती दिली. पुरेसे चलन उपलब्ध झाल्यानंतर २००० च्या नोटा चलनातून बाद केल्या जाव्यात, याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.” असे देखील मित्रा म्हणाले आहेत.