निवडणुका घ्यायला फाटते का? संजय राऊत यांचा सरकारला सवाल

मुंबई, २१ मे  / प्रतिनिधी :-शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका या मुदत संपल्या असून देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलल्या जात आहेत. यावरुन त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवता, निवडणूक घ्यायला तुमची फाटते का? असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटासह भाजपला टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशात न्यायालयाचा गैरवापर सुरु असल्याचे सांगितले. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणूका घ्यायला तुमची फाटते का? हिंमत असेल तर निडवणुका घ्या. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात. मैदान सोडून पळू नका, मैदानात या. असे राऊत यांनी म्हटले. तसेच कर्नाटक निवडणुकीवरुन त्यांनी भाजपला डिवचले आहे. कर्नाटकात 200 जागा जिंकणार होतात. तिथे प्रचारासाठी सर्व फौज उतरवली. राष्ट्रपती तेवढे बाकी ठेवले असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. यावर राऊत यांनी लहान भाऊ आणि मोठा भाऊ हा विषय शिवसेना भाजपमध्ये झाल्याची आठवण करुन दिली. तसेच सर्वांची डीएनएन टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.