मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

लातूर,१० मे  / प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले.

लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी उपस्थित होते.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाची माहिती देणारी भित्तीपत्रिका, घडीपत्रिका लातूर जिल्हा परिषदेने तयार केली असून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. तसेच मनरेगा योजनेवर आधारित रवींद्र इंगोले लिखित ‘माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.