वैजापूर व आघुर येथे मारहाणीच्या घटना ; आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर ,८ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील महाराणा चौक भागात भांडण सोडवल्याच्या कारणावरुन तिघांनी फायबरच्या दांडक्याने दोघांना मारहाण करुन जखमी केले. शैलेश राजपूत व राणा राजपूत यांचे भांडण झाले होते. हे भांडण गणेश राजपूत याने सोडवले याचा राग मनात धरत राणा राजपूत याच्यासह चौघांनी गणेश राजपूत व त्याचा चुलत भाऊ मनोज राजपूत (रा.‌कादरीनगर) यांना फायबरच्या दांडक्याने मारहाण करुन जखमी केले व मनोज राजपूत यांच्या वडीलांनाही मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनोज राजपूत यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हेड कॉन्स्टेबल गोरे यांनी चार जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक योगेश झाल्टे हे तपास करीत आहेत. 

शेतात पाइपलाइन टाकण्याच्या कारणावरुन मारहाण

—————————————————————–

शेतात पाइपलाइन टाकण्याच्या कारणावरुन नातेवाईकांनीच मारहाण केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील आघूर येथे घडली. साहेबराव दादा आव्हाळे व त्यांचे सहकारी हे शेतात पाइपलाइन टाकण्याचे काम करत असतांना गोकुळ दादा आव्हाळे, शुभम दादा आव्हाळे, रविंद्र रघुनाथ आव्हाळे व निर्मला गोकुळ आव्हाळे हे त्या ठिकाणी आले व मला विचारल्याशिवाय माझ्या शेतातुन पाइपलाइन का केली अशी विचारणा केली. त्यावर समजावुन सांगत असतांना गोकुळ आव्हाळे व त्याच्या साथीदारांनी साहेबराव आव्हाळे यांना फावड्याच्या दांडक्याने गुडघ्यावर मारहाण करुन जखमी केले व शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार साहेबराव आव्हाळे यांनी पोलिसांत दिली. त्यावरुन अंमलदार आर.बी. कवडे यांनी आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक सिंघल हे करीत आहेत.