बेलगाव शिवारात शेततळ्यात बुडून चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

वैजापूर ,​७​ मे  / प्रतिनिधी :-  शेततळ्यात बुडून आठ वर्षाच्या चिमुकल्यासह एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात  घडली. या घटनेमुळे बेलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कपिल त्रिभुवन
पियुष

पियुष विजय जिवडे (वय 8 वर्ष) हा जागरण गोंधळ करणाऱ्या भाटे कुटुंबातील मुलगा आपल्या कुटुंबियांसह भादली (ता.कोपरगाव) येथे जात होता. रस्त्यात विश्राम करण्यासाठी हे कुटुंब बेलगाव शिवारातील गट क्रमांक 160 मधील किरण त्रिभुवन यांच्या शेतात थांबले असता पियुष हा शेतातील शेततळ्याजवळ गेला व पाण्यात पडला.त्याला वाचविण्यासाठी कपिल त्रिभुवन या तरुणाने पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना शेततळ्यातून बाहेर काढले व वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू पावलेला कपिल त्रिभुवन हा कोपरगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता व एकुलता एक मुलगा होता.