शरद पवारांकडून राजीनामा मागे घेण्याचे संकेत

दोन दिवसांनी तुम्हाला असे बसावे लागणार नाही – शरद पवार

मुंबई, ४ मे  / प्रतिनिधी :-  निवृत्तीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा वाय बी सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, “राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली.या निर्णयानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना याचा मोठा धक्का बसला. लोक पवारांसमोरच अश्रू ढाळू लागले. काही कार्यकर्त्यांनी तर यंशतराव चव्हाण सेंटरच्या बाहेरच उपोषणाला सुरुवात केली. या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न केले. मात्र, कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आज खुद्द शरद पवार यांनी वाय. बी. सेंटरला येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दोन दिवसात तुमच्या मनासारखा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

ते पुढे म्हणाले, “मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचंय. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन. येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो,” असंही सुचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

देशभरातून अनेक सहकारी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाहेरच्या लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सांगत शरद पवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याची दिसली.