वैजापूर बाजार समितीवर शिवसेना -भाजप युतीचे वर्चस्व ; युतीला 11 तर आघाडीला 7 जागा

वैजापूर ,२९ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकारी विकास पॅनलने 18 पैकी 11 जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.‌ तर कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित आघाडी व भाजपाचे काही उमेदवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत. जनतेने विकास कामांना कौल दिल्याची प्रतिक्रिया विजयी मिरवणुकीनंतर आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी दिली. 

निवडणूक निर्णय अधिकारी विनय धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण आठ टेबलावर मतमोजणी झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. सहकार संस्था मतदार संघातून आमदारांच्या पॅनलचे काकासाहेब पाटील (७३८ मते), कल्याण जगताप (५९७ मते), रामहरी जाधव (६७५ मते), कल्याण दांगोडे (६७६ मते), शिवकन्या पवार (६३८ मते), रजनीकांत नजन (६९२ मते) हे उमेदवार निवडून आले. या मतदारसंघात माजी सभापती भागिनाथ मगर (५६७ मते), कचरु पाटील डिके (४५३ मते), धनंजय धोर्डे (५४४ मते), शिवाजी गोरे (५७६ मते) या दिग्गजांचा पराभव झाला. तर ग्रामपंचायत मतदार संघातील आमदार पॅनलचे गणेश इंगळे (६८९ मते), प्रवीण पवार (४९९ मते), प्रशांत त्रिभुवन (६२० मते) व गोरख आहेर (५५० मते) हे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडुन आले.  या पॅनलचा व्यापारी मतदारसंघातुन एकही उमेदवार निवडून आला नाही. या पॅनलचे सुरेश तांबे (७६ मते) व नितिन बोहरा (५५ मते) यांना पराभवाची धुळ चाखावी लागली.‌

हमाल मापाडी मतदार संघात पॅनलचा बाबासाहेब गायकवाड (१६४ मते) हा उमेदवार २३ मतांनी निवडून आला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, काँग्रेसचे नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे (७२९ मते), ज्ञानेश्वर पाटील जगताप (५९४ मते), माजी सभापती संजय पाटील निकम (६५८ मते), अनिताताई देविदास वाणी (८५२ मते), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ (७१४ मते) व व्यापारी मतदार संघातून उल्हास (विजय) ठोंबरे (८७ मते) व शेख रियाज शेख अकिल (९९ मते) हे सात उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे जे.के. जाधव (५६९ मते), रिखबचंद पाटणी (४७५ मते), बाळासाहेब भोसले (५३१ मते), द्वारका पवार (४९२ मते), यशवंत पडवळ (४२७ मते), अमृत शिंदे (४९३ मते), रविंद्र पगारे (१४१ मते) हे उमेदवार पराभूत झाले.

आमदार पॅनलच्या उमेदवारांची विजयी मिरवणुकीचा समारोप आमदार संपर्क कार्यालयात झाला. यावेळी आमदार रमेश पाटील बोरणारे, जिल्हा बॅंकेचे आप्पासाहेब पाटील, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, खुशालसिंह राजपूत यांची भाषणे झाली. यावेळी  शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, दिनेश राजपूत, पारस घाटे आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी आऊट !

या निवडणुकीत भाजपाचे दोन, शिवसेना शिंदे गट व आप्पासाहेब पाटील यांचे दहा, कॉग्रेसचे दोन व ठाकरे गट शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले. मात्र राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला भोपळा फोडता आला नाही. राष्ट्रवादीचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पंकज ठोंबरे व जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांचा वाद चव्हाट्यावर आला. ओबीसींवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एल.एम. पवार यांनी दिली.‌