नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन प्रकल्प आर्थिक घडामोडी वाढवण्यात मदत

पंतप्रधानांनी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला केले समर्पित

नवी दिल्ली, 13 सप्‍टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन  विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका हा भाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्लांटचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल आणि एचपीसीएल,  या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी हे प्रकल्प उभारले आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही वर्षांपूर्वी बिहारसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये राज्याच्या पायाभूत सुविधांवर जास्त भर होता. ते म्हणाले की बिहारला देण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये पेट्रोलियम आणि वायूशी संबंधित 21 हजार कोटी रुपयांचे 10 मोठे प्रकल्प होते. यापैकी आज हा सातवा प्रकल्प  बिहारच्या लोकांना समर्पित केला जात आहे. यापूर्वी बिहारमध्ये पूर्ण झालेल्या इतर सहा प्रकल्पांचीही  यादी त्यांनी सादर केली. सुमारे दीड वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या महत्त्वपूर्ण गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या दुर्गापूर-बांका विभागाचे (सुमारे 200 किमी) उद्घाटन करत आहोत याबद्दल त्यांनी  आनंद व्यक्त केला. आव्हानात्मक भूभाग असूनही अभियंता आणि कामगार यांचे परिश्रम व राज्य सरकारने  वेळेत  प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी केलेल्या सक्रिय सहकार्याचे त्यांनी कौतुक  केले.  एक पिढी काम सुरू करायची आणि दुसरी पिढी ते  पूर्ण करायची या कार्य संस्कृतीतून बिहारला मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की ही नवीन कार्यसंस्कृती बळकट करण्याची गरज आहे आणि यामुळे बिहार आणि पूर्व भारत विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो.

पंतप्रधानांनी “सामर्थ्य मूलं स्वातंत्र्यम्, श्रम मूलं वैभवम् ।” हे शास्त्र वचन उद्धृत केले. याचा अर्थ शक्ती हा स्वातंत्र्याचा स्रोत आहे आणि श्रम शक्ती ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा आधार आहे. ते म्हणाले की, बिहारसह पूर्व भारतात श्रम शक्तीची कमतरता नाही आणि या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांची देखील कमतरता नाही आणि असे असूनही, बिहार आणि पूर्व भारत अनेक दशकांपर्यंत विकासाच्या बाबतीत मागे राहिला आणि राजकीय, आर्थिक कारणांमुळे आणि इतर प्राधान्यक्रमांमुळे कायम  विलंब सहन करावा लागला. ते म्हणाले, रस्ते जोडणी, रेल्वे जोडणी, हवाई संपर्क, इंटरनेट जोडणी यांना  यापूर्वी प्राधान्य नसल्यामुळे बिहारमध्ये गॅस आधारित उद्योग आणि पेट्रो-कनेक्टिव्हिटीची कल्पनाही केली गेली नाही. ते म्हणाले की गॅस आधारित उद्योगांचा विकास बिहारमध्ये एक मोठे आव्हान आहे कारण ते चहुबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे  आणि त्यामुळे पेट्रोलियम आणि गॅसशी संबंधित संसाधनांचा अभाव आहे जी अन्यथा समुद्राला लागून असलेल्या राज्यात उपलब्ध आहेत.

पंतप्रधान म्हणाले, गॅस-आधारित उद्योग आणि पेट्रो-कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनमानावर होतो आणि कोट्यवधी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ते म्हणाले, आज सीएनजी आणि पीएनजी बिहार आणि पूर्व भारतातील अनेक शहरांमध्ये पोहोचत आहेत, येथील लोकांना सहज या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ते म्हणाले की, पूर्व भारताला पूर्वेकडील समुद्राच्या किनारपट्टीवर पारादीपशी आणि पश्चिम समुद्रावरील कांडलाशी जोडण्याचा भगीरथ प्रयत्न पंतप्रधान उर्जा गंगा योजनेंतर्गत सुरू झाला आणि सुमारे 3000 किमी लांबीच्या या पाइपलाइनद्वारे सात राज्ये जोडली जातील, त्यापैकी बिहार देखील यात एक प्रमुख भूमिका पार पाडेल.  पारादीप – हल्दिया  मार्ग आता पुढे  पाटणा, मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात येईल आणि कांडलाहून येणारी पाइपलाइन जी गोरखपूरला पोहोचली, ती देखील त्याला जोडली जाईल. ते म्हणाले की जेव्हा हा संपूर्ण प्रकल्प तयार होईल, तेव्हा तो जगातील सर्वात लांब पाइपलाइन प्रकल्पांपैकी एक असेल.

पंतप्रधान म्हणाले की या गॅस पाइपलाइनमुळे बिहारमध्ये मोठे बॉटलिंग प्रकल्प उभारले जात आहेत. त्यापैकी दोन नवीन बॉटलिंग प्रकल्प आज बांका आणि चंपारण येथे सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये दरवर्षी 125 दशलक्षहून अधिक सिलिंडर्स भरण्याची क्षमता आहे. हे प्रकल्प गोड्डा, देवघर, दुमका, साहिबगंज, पाकूर जिल्हे आणि झारखंडमधील उत्तर प्रदेशचा काही भागांच्या एलपीजी गरजा पूर्ण करतील. ते म्हणाले की, या गॅस पाइपलाइन टाकण्यापासून ते पाइपलाइनमधील उर्जेवर आधारित नवीन उद्योगांमधून बिहार हजारो नवीन रोजगार निर्माण करत आहे.

ही गॅस पाइपलाइन तयार झाल्यावर यापूर्वी बंद असलेल्या बरौनीचा खत कारखाना लवकरच काम सुरू करेल असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, आज देशातील आठ कोटी गरीब कुटुंबांकडे  उज्ज्वला योजनेमुळे गॅस जोडण्या आहेत. यामुळे कोरोनाच्या काळात गरीबांचे जीवन बदलले आहे कारण त्यांना घरी राहणे आवश्यक होते आणि त्यांना लाकूड किंवा इतर इंधन गोळा करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नव्हती.

पंतप्रधान म्हणाले की कोरोनाच्या या काळात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना  कोट्यवधी सिलिंडर विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली ज्याचा लाभ कोट्यवधी गरीब कुटुंबांना झाला.  संसर्ग होण्याचे धोके असूनही पेट्रोलियम आणि वायू  विभाग आणि कंपन्या तसेच कोट्यवधी वितरण करणाऱ्या भागीदारांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, एक काळ असा होता की बिहारमध्ये एलपीजी गॅस जोडण्या  श्रीमंत लोकांचे लक्षण होते. प्रत्येक गॅस कनेक्शनसाठी लोकांना शिफारसी कराव्या लागत होत्या.  परंतु आता बिहारमध्ये उज्ज्वला योजनेमुळे हे चित्र बदलले आहे.  बिहारमधील सुमारे 1.25 कोटी गरीब कुटुंबांना विनामूल्य गॅस जोडण्या  देण्यात आल्या आहेत. घरात गॅस जोडणीमुळे  बिहारमधील कोट्यवधी गरीबांचे जीवन बदलले आहे.

पंतप्रधानांनी बिहारच्या  तरुणांचे कौतुक केले आणि म्हणाले की बिहार देशाच्या प्रतिभेचे उर्जास्थान आहे. ते म्हणाले की बिहारची ताकद आणि बिहारच्या श्रमाचा ठसा प्रत्येक राज्याच्या विकासामध्ये दिसेल. ते म्हणाले, गेल्या 15 वर्षात बिहारनेही  योग्य सरकार, योग्य निर्णय आणि स्पष्ट धोरण असल्यास  विकास होतो आणि प्रत्येकापर्यंत  पोहोचतो हे दाखवून दिले आहे. एक असाही विचार होता,  शिक्षण आवश्यक नाही कारण बिहारमधील तरुणांना शेतात काम करायचे आहे.  या विचारसरणीमुळे, बिहारमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था उघडण्याचे काम फारसे झाले नाही. याचा परिणाम असा झाला की बिहारमधील तरुणांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर पडण्यास भाग पाडले गेले. शेतात काम करणे, शेती करणे हे खूप कष्टाचे काम आहे, अभिमानाचे आहे, परंतु तरूणांना इतर संधी द्यायच्या नाहीत, तशी व्यवस्था करायची नाही  हे योग्य नव्हते.

पंतप्रधान म्हणाले की आज बिहारमध्ये शिक्षणाची मोठी केंद्रे सुरू होत आहेत. आता कृषी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. आता बिहारमधील आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी बिहारमधील तरुणांची स्वप्ने उंचावण्यासाठी मदत करत आहेत. बिहारमधील पॉलिटेक्निक संस्थाची संख्या तीनपट वाढविण्यात आणि बिहारमध्ये दोन मुख्य विद्यापीठे,  एक आयआयटी, एक आयआयएम, एक एनआयएफटी आणि एक राष्ट्रीय विधि संस्था सुरू करण्यासाठी  बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना आणि अशा अनेक योजनांमुळे बिहारमधील तरुणांना आवश्यक प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. ते म्हणाले की, आज बिहारमधील शहरे व खेड्यांमध्ये विजेची उपलब्धता पूर्वीपेक्षा जास्त आहे. उर्जा, पेट्रोलियम आणि गॅस क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण  केल्या जात आहेत, त्या सुधारणांच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुकर बनवत आहे तसेच उद्योगांना आणि अर्थव्यवस्थेला चालना देत आहे.  ते म्हणाले की कोरोनाच्या या काळात पुन्हा पेट्रोलियमशी संबंधित पायाभूत सुविधा , उदा. रिफायनरी प्रकल्प, शोध किंवा उत्पादनाशी संबंधित प्रकल्प, पाइपलाइन, शहर गॅस वितरण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. ते म्हणाले की,  8 हजाराहून अधिक प्रकल्प आहेत, यावर आगामी काळात 6 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

पंतप्रधान म्हणाले, स्थलांतरित कामगार परत आले आहेत आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या जागतिक महामारीच्या काळातही  देश थांबलेला नाही विशेषतः बिहार थांबलेला नाही. 100 लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीचा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन प्रकल्प आर्थिक घडामोडी वाढवण्यात मदत करेल असे ते म्हणाले.  बिहार, पूर्व भारत विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवण्यासाठी प्रत्येकाने वेगाने काम करत रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *