आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यावर भर- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
- महसूल राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड-सोयगाव तालुका आढावा बैठक
- माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यावर अधिक भर
औरंगाबाद, दि.13 :- भविष्यातील संकट लक्षात घेऊन कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करण्याच्या सूचना महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केल्या. सोयगाव येथील नव्याने उभारणात येणाऱ्या कोविड केंद्र बांधकामाचा शुभारंभ जरंडी येथील कोविड सेंटर सेवा निम्बायती येथील नियोजित कोविड सेंटरची पाहणी , सिल्लोड नगरपरिषदेच्या हायपोक्लोराईड, धूर फवारणी नविन गाड्याचे लोकार्पण आदीसह सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील कोनोना संदर्भात शासकीय यंत्रणाची आढावा बैठक राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, , सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे, सिल्लोडचे तहसिलदार राम गोरे, सोयगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम.बी. कसबे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास सोनवणे, आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड तालुक्यात दररोज बाराशे लोकांना घरपोच जेवण देण्यात येते. राज्यशासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन योजना गरजूंना लाभदायी ठरत आहे. सिल्लोड तालुक्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ योजना रुग्णांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. सिल्लोड नगरपरिषदे अंतर्गत हायड्रोक्लोराईड फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले असून एकही गाव विना फवारणी राहणार नाही .यासाठी लागणारी सर्व साहित्य पुरवले जातील. गोरगरिबांना खाजगी रुग्णालयात जाणे शक्य होत नसल्याने शासकीय रुग्णालय सुसज्ज आणि अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे श्री. सत्तार म्हणाले.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले की, कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देशित केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात व्यापक स्वरूपात लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी करण्यात येईल. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात 50 घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने या मोहिमेतून नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य विषयक माहिती संकलन तसेच लोकांच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छता, कोणताही आजार अंगावर न काढता तातडीने योग्य वैद्यकीय सल्ला घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून या लोकप्रबोधन, जनशिक्षण आणि जनजागृतीव्दारे कोरोना आजार हा वेळीच निदान करून योग्य उपचाराने बरा होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये वाढण्यास मदत होईल, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.