त्यांनी शुद्ध आचरणाचा मार्ग बदलला आणि ही वेळ आली-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका

अहमदनगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना मी नेहमीच शुद्ध आचरण ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही पुढे त्यांनी मार्ग बदलला. आता त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीका एकेकाळचे सहकारी असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, दिल्ली सरकारच्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करीत आहे. यात केजरीवाल दोषी आढळले तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असेही अण्णा हजारे म्हणाले.

दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक झाली आहे. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलाविले आहे.

केजरीवाल यांच्या चौकशीसंबंधी अण्णा हजारे म्हणाले, ‘मी पूर्वीच केजरीवाल यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होती की हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे,’ असा गौप्यस्फोटही अण्णा हजारे यांनी केला आहे.