काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल:आझाद, व्होरा, खरगेंना सरचिटणीसपदावरून हटविले
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीत पुनर्गठन करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वावर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करताना, सोनिया गांधी यांनी आज शुक्रवारी गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, मोतिलाल व्होरा, मल्लिकार्जुन खरगे या जेष्ठ नेत्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावरून हटविले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीचं पुर्नगठन करण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचे कार्यकारिणीत स्थान कायम आहे. आझाद आणि शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यांनी जाहीरपणे पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून कार्यकारीणी बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तसेच जितिन प्रसाद यांची काँग्रेसने पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षातील वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.
या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे.पक्षाची घडी नीट बसविण्याचा आणि पक्षात शिस्त आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सोनिया गांधी यांनी आज संघटनेत व्यापक फेरबदल केले आहेत. गेल्या महिन्यात 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनियांना पत्र लिहून पूर्णवेळ लक्ष देऊ शकेल, अशा नेत्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्याची मागणी केली होती. पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत या पत्रावरून प्रचंड वादळ उठले होते. पक्षाची सूत्रे सध्या सोनियांकडेच कायम असली, तरी संघटनेच्या दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी त्यांनी विशेष समिती गठित केली असून, यात ए. के. अॅण्टनी, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुर्जेवाला आणि अंबिका सोनी यांचा समावेश केला आहे. याशिवाय, पी. चिदम्बरम्, जितेंद्रसिंह, तारिक अन्वर आणि रणदीप सुर्जेवाला नियमित सदस्य असतील.
सोबतच, सुर्जेवाला यांना पक्षाचे महासचिव करण्यात आले असून, त्यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. मधुसूदन मिस्री यांना केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष करण्यात आले असून, प्रियांका वढेरा यांच्याकडे उत्तरप्रदेशचे प्रभारीपद कायम ठेवण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांना मध्यप्रदेश, हरीश रावत यांना पंजाब, ओमन चंडींना आंध्रप्रदेश की, तारिक अन्वर यांना केरल व लक्षद्वीप, जितेंद्रसिंह यांना आसाम आणि अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली. जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबारचे प्रभारी करण्यात आले आहे. पवनकुमार बंसल प्रशासकीय सचिव असतील, तर मनकीम टागोर तेलंगणा प्रभारी सचिव असतील आहेत.
महाराष्ट्रातून चौघांना स्थान
काँग्रेस संघटनेच्या फेररचनेत राज्यातील चार काँग्रेस नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचा दलित चेहरा असलेल्या मुकुल वासनिक यांच्याकडे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले. गेल्याच महिन्यात पक्षातील २३ नेत्यांनी पूर्णवेळ पक्षाध्यक्ष असावा म्हणून लिहिलेल्या पत्रावर वासनिक यांची स्वाक्षरी होती. त्यांच्याकडे मध्य प्रदेश राज्याची जबाबदारीही सोपविण्यात आली.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय खासदार राजीव सातव यांच्याकडे गुजरात, दादरा आणि नगरहवेली तसेच दीव-दमण या राज्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी कायम ठेवण्यात आली. तसेच पक्षाच्या निर्णयप्रक्रि येतील सर्वोच्च अशा कार्यकारी समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
पक्षाचे माजी सरचिटणीस अविनाश पांडे यांची कार्यकारी समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी होते.
माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे जम्मू आणि काश्मीर राज्याचे प्रभारीपद सोपविताना त्यांना पक्षाच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.