कोरोनाने मोडले सर्वच रेकॉर्ड,राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच
नवी दिल्ली,मुंबई 10 सप्टेंबर:
कोरोना रुग्णांची वाढती संख्या देशासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या २४ तासात नव्याने आढळून आलेल्या रुग्णवाढीने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले असून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ९५ हजार ७३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल एका दिवसात १ हजार १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. एकूण बाधितांपैकी सध्या देशात ९ लाख १९ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ हजार ७१ लाख ७८४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात ७५ हजार ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी 23 हजारांपेक्षा जास्त नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 23,446 नवे रूग्ण आढळलेत. तर 448 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतच दिवसभरातली ही सर्वात जास्त संख्या आहे. राज्यातल्या रूग्णाची एकूण संख्या ही 9,90,795 एवढी झाली आहे.सलग आठवडाभर दररोज 20 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसभरात 14,253 रूग्ण बरे झाले आहेत.