भाजपला रामराम ठोकून अभय पाटील चिकटगावकर यांचा के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश

वैजापूर ,१ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील युवा नेतृत्व अभय पाटील चिकटगावकर यांनी तेलंगणा राज्यातील के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस या पक्षात प्रवेश घेतला आहे. तब्बल वीस वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र तिथेही विकासाची अपेक्षा पुर्ण न झाल्याने के चंद्रशेखर राव यांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन बीआएस पक्षात प्रवेश घेतला असुन हा पक्ष संपुर्ण तालुक्यात व पर्यायाने राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करु असे चिकटगावकर यांनी सांगितले.

चिकटगावकर यांनी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व बीआरएसचे कार्यकर्ता प्रवीण जेठेवाड व अविनाश प्रधान यांच्यासोबत पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. राज्याच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेलंगणा राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली अल्पाधित चांगली प्रगती केली आहे. तेथील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळत असुन रेतुबंध योजने अंतर्गत आर्थिक मदत, रेतुविमा योजनेअंतर्गत पाच लाख रुपये विम्याचा लाभ, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, सिंचन प्रकल्प आदी सोयीसुविधा निर्माण केल्याने अकरा जिल्हे असलेले हे राज्य शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असुन सीमा प्रदेशातील शेतकरी तेलंगणा राज्यात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे चिकटगावकर यांनी सांगितले.

मुंबईसारख्या आर्थिक राजधनीमुळे महाराष्ट्राचे बजेट खुप मोठे आहे.‌ असे असतांना शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही.‌ सिंचन प्रकल्प रखडले आहेत. मराठवाडा व विदर्भ या दोन राज्यांचा अनुशेष तर अद्याप शिल्लक आहे.‌ सत्तापिपासु वृत्तीमुळे राज्यातील राजकारण स्वकेंद्रित झाले आहे. मागील काही वर्षात तर विकासाचे प्रश्न बाजुला ठेऊन जात, धर्म या विषयावर महापुरुषांचे नावे घेऊन राजकारण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मग अशा परिस्थितीत विकास कसा साधला जाणार असा प्रश्न चिकटगावकर यांनी केला.

तेलंगाना विकासाचे मॉडेल राज्यात राबवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असुन येणाऱ्या सर्व निवडणुका बीआरएस पक्ष लढवणार असुन सर्व पक्षांना धडा शिकवु असे माजी चिकटगावकर यांनी स्पष्ट केले.‌ सर्व पक्षांनी मर्यादा ओलांडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंचनाच्या बाबतीत राज्यातील किचकट कायदे बाधक ठरत असल्याचे माजी आमदार धोंडगे यांनी सांगितले.