किराडपुरा दंगल :आठ आरोपींच्‍या मुसक्या जिन्‍सी पोलिसांनी आवळल्या;आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

जमावाने केलेल्या प्राण घातक हल्ल्यात कर्तव्‍यावरील १६ अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर,३१ मार्च  / प्रतिनिधी :-  “इनको निकालो, जाकर मार डालो, आज किसीको जिंदा नही  छोडेंगे ” अशा घोषणा देत मंदिर परिसरात तुफान दगडफेक करण्‍यात आली. यात पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जमावाने पोलिसांची शासकीय १२ वाहने आणि दोन पोलिसांच्‍या खासगी दुचाकी जाळून खाक केल्या. अशा प्रकारचा हैदोस घालणाऱ्या  ५०० ते ६०० च्‍या जामावापैकी आठ आरोपींच्‍या मुसक्या जिन्‍सी पोलिसांनी आवळल्या आहेत. आठही आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी शुक्रवार दि.३१ दिले.

बरकत शौकात शेख (२३), शेख अतिक शेख हारुण (२४), सद्दामशह बिस्मिल्ला शहा (३३, सर्व रा. कटकटगेट किराडपुरा), शेख खाजा शेख रशिद (२५, रा. खासगेट), शारेख खान इरफान खान (२३, रा. राजाबाजार), शेख सलीम शेख अजीज (२५, रा. सेंदुरजण, सिंदखेड राजा जि. बुलढाणा), सय्यद नुर सय्यद युसूफ (३०, रा. गल्ली नं.६, बायजीपुरा) आणि शेख नाजीम शेख अहेमद (२४, रा. किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

किराडपुऱ्यातील पुरातन राम मंदिर परिसरात राम नवमीनिमित्त मंदिरात बुधवारी जय्यत तयारी सुरु असतांना रात्री ११ वाजेच्‍या सुमारास वाहनाचा धक्का लागल्याच्‍या कारणावरुन काही तरुणांमध्‍ये वाद झाला. त्‍यावेळी पोलिसांनी मध्‍यस्‍थी केली. मध्यरात्रीनंतर दीड वाजता अचानक २०० ते २५० जणांचे दोन गट असे सुमारे ५०० ते ६०० लोक लाठ्या-काठ्या, सळया घेवून समोरा-समोर आले. पोलिसांनी त्‍यांना वारंवार सुचना देवून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी राममंदीर आणि पोलिसांवर दगडफेक करीत पोलिसांची शासकीय आणि खासगी वाहने पेटविली.

image.png

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रुधाराच्‍या नळाकांड्या फोडल्या, मात्र जमाव अधिकच उग्र झाला, त्‍यामुळे पोलिसांनी डमी राउंड फायर केले, तरी देखील जमाव नियंत्रणात आला नाही.

उलट जमाव राममंदीर आणि पोलिसांच्‍या दिशेने प्राण घातक हल्ला करण्‍याच्‍या दिशेने आला. व इनको निकालो, जलाकर मार डालो, आज किसीको जिंदा नहि छोडेंगे अशा घोषणा देत राम मंदिराच्या मालमत्तेचे नुकसान करण्‍यास सुरवात केली. त्‍यावेळी उस्‍मानपुरा ठाण्‍याच्‍या निरीक्षक गिता बागवडे यांनी सर्विस पिस्‍टल मधुन पाच ते सहा जिवंत काडतुस निलींग पोजीशन मध्‍ये फायर केले. त्‍यावेळी समोरील जमावात शौकत चांद शहा, अरबाज, रिजवान शेख पाशु, शेख मुनीरोद्दीन शेख मोईनोद्दीन, अल्ताफ फेरोज मौलाना, हाश्‍मी इत्तरवाल्याचाम मुलगा यांच्‍यासह इतर २० ते २५ लोक होते. 

image.png

जमावाने केलेल्या प्राण घातक हल्ल्यात कर्तव्‍यावरील १६ अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले. प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ५०० ते ६०० जणांच्‍या जमावा विरोधात भादंवी कलम ३०७, ३५३, २९५, ३३२, ३३३, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, १५१, १५२, १५३, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्‍या कलम ३,४, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्‍टच्या कलम ७ सह महाराष्‍ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ व १४० नूसार जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

image.png

आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

 सहा आरोपींना गुरुवारी दि.३० रात्री तर दोन आरोपींना आज दुपारी एक वाजेच्‍या सुमारास अटक करुन न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. सुनावणीवेळी गुन्‍हा गंभीर असून आरोपींनी गुन्‍हा करतेवेळी वापरलेल्या लाठ्या-काठ्या आणि सळया हस्‍तगत करायच्‍या आहेत. आरोपींच्‍या साथीदार कोण आहेत याचा तपास करुन त्‍यांना अटक करायची आहे. गुन्‍हा करण्‍यामागे नेमका काय हेतू होता. याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील आमेर काजी आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक ए.बी. मगरे यांनी न्‍यायालयाकडे केली.

आम्हीच आरोपी कशावरुन?

पाचशे ते सहाशे जमावामधून वरील आम्हीच आरोपी होते हे कशावरून ओळखले. यात आरोपींचा सहभाग नाही. आरोपींकडून गुन्‍ह्यात वापरलेले कोणतेच हत्‍यार हस्‍तगत करण्‍यात आलेले नाही. आरोपींवर विनाकारण बिनबुडाचे आरोप करण्‍यात आले आहेत. कोणत्‍या गुन्‍ह्याखाली कोणत्‍या आरोपीला अटक केली याची माहिती नाही. त्‍यामुळे आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी न करता त्‍यांना न्‍यायालयीन कोठडी देण्‍यात यावी अशी विनंती आरोपींच्‍या वतीने करण्‍यात आली.